उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न
लोणंद – भारत गिअर्स कंपनीतील कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या युनियनचे सदस्यत्व घेऊन कंपनी व्यवस्थापनाविरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी युनियनचे पदाधिकारी व व्यवस्थापनाची लोणंद पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेऊन कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमधील वाद संपवण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी लोणंदचे प्रभारी सपोनि प्रशांत नागटिळक, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले, कंपनीचे व्यवस्थापक संदीप गद्रे, कंपनी एचआर लोकेश कुमार आदी उपस्थित होते. यशवंत भोसले म्हणाले, युनियन करण्याचा कामगाराना अधिकार असून राष्ट्रीय श्रमिक आघाडीने भारत गिअर्स कंपनी लोणंदमधे युनियन केल्यानंतर कंपनी व्यवस्थापन गुंडाना बरोबर घेऊन कामगाराच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव आणुन युनियनच्या सदसत्वाचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करत आहे, युनियनच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या अन्यथा मुंब्रा व फरिदाबाद येथे बदली करू अशी धमकी देत आहेत. तसेच कंपनीतील ठेकेदार कामगारांची पिळवणूक करत असून कामगारांना दमदाटी करत आहेत, असे असताना व्यवस्थापनाने ठेकेदारांना पाठीशी घालू.
यावेळी कंपनीच्यावतीने बोलताना लोकेश कुमार व संदीप गद्रे म्हणाले, कंपनी सुरु झाल्यापासून कामगारांची कंपनी विरोधात एकही तक्रार नाही, त्यामुळे कामगारांनी कोणतेही आदोलन करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे व्यवस्थापनाचे मत आहे. तसेच युनियनचे पदाधिकारी आम्हाला पुण्याला येऊन भेटा म्हणत असून त्यांनी ठेकेदारांना व व्यवस्थापनाला गुंड म्हणणे चुकीचे असून आमच्यावर कसलेही गुन्हे दाखल नाहीत. कामगार युनियनच्या वादामुळे लोणंदमधील कंपन्या बंद पडु लागल्या आहेत. आमची कंपनी बंद पडु नये अशी आमची इच्छा असून युनियन सुरु झाल्यानंतरही कंपनी सुरळीत सुरु आहे. त्यामुळे कामगारांना आंदोलनाची गरज नसून चर्चेतुन मार्ग निघु शकतात.
तालुका पोलिस प्रमुख तानाजी बरडे म्हणाले, 80 कामगार सातारा येथे जाऊन कंपनीविरुद्ध आंदोलन करतात हे कंपनी व कायदा सुव्यवथेच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे सर्व कामगारानी पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडावे, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन शहानिशा करून दोषींवर कारवाई करू, कामगारांना कोणीही धमकावले तर त्यांची गय केली जाणार नसून कामगारानीदेखील कंपनीची नाहक बदनामी होईल व कंपनी बंद होईल असे कोणतेही वर्तन करु नये, अशा सुचना दिल्या.