पिंपरी – जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणेच महापालिकेच्या शाळेतही वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या शिक्षकांच्या बदलीचा महत्त्वपूर्ण ठराव शिक्षण समितीने घेतला आहे. त्यामुळे आता तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या तात्काळ बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण समितीच्या या निर्णयामुळे राजआश्रय असणाऱ्या शिक्षकांचे संबंधित शाळेवरील वर्चस्व संपुष्टात येणार असल्यामुळे शिक्षण समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मागील काही वर्षापर्यंत काही शिक्षक वर्षानुवर्षे एकाच शाळेत ठाण मांडणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील शिक्षकांची समायोजन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. मात्र, समायोजन पद्धतीने बदल्या होत असतानाही राजकीय वरदहस्त लाभलेले काही शिक्षक पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतर् एकाच शाळेत काम ठिय्या मांडून बसले आहेत.
वास्तविक महापालिका शाळेतही तीन किंवा पाच वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील अनेक शाळांमध्ये राजकीय पाठबळ असलेल्या शिक्षकांची 25 वर्षे सेवा बजावूनही बदली झाली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होत होता. ही बाब प्रशासनाच्या निर्दशनास आल्यानंतर आता शिक्षण समितीने याबाबत धाडसी निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या तातडीने बदल्या करण्याचा ठरावच शिक्षण समितीने घेतला आहे. शिक्षण समितीच्या या ठरावामुळे आता तीन वर्षापेक्षा अधिक काळ एकाच शाळेत वास्तव्यास असणाऱ्या शिक्षकांच्याही तातडीने बदली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षण समितीनेच हा निर्णय घेतल्यामुळे वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या सर्वच शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
यापूर्वीही केली होती कारवाई
महापालिकेच्या प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी एकाच शाळेत गेल्या 15 वर्षे ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. राजकीय दबाव झुगारत त्यांनी 46 शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी सोयीच्या ठिकाणी बदल्या न मिळाल्याने अनेक शिक्षक बदली रद्द करण्यासाठी नगरसेवकांच्या शिफारशी घेऊन शिक्षण विभागात हेलपाटे मारत होते. त्या शिक्षकांच्या शाळांची यादीमध्ये 44 मराठी माध्यमांची, दोन उर्दू माध्यमातील शिक्षक आढळले. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एका शाळेत 14 ते 25 वर्ष अध्यापन करत असलेल्या 33 उपशिक्षकांचा समावेश आहे. त्यानंतर 10 ते 20 वर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या 12 पदवीधर शिक्षक, तर उर्दू माध्यमिक शाळांमधील दोन उपशिक्षकांची बदली करण्यात आली होती.
सेवा ज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षकांची पदे
दरम्यान, महापालिका शिक्षण समितीने एकाच शाळेत तीन वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, पर्यवेक्षकांची पदे भरताना नियमाप्रमाणे सेवा ज्येष्ठतेने भरावीत, तसेच शासनाकडून अतिरिक्त म्हणून पाठविण्यात आलेल्या शिक्षकांची भरती न करता रीतसर जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात यावी, याशिवाय उर्दू माध्यमांच्या 43 जागा व हिंदी माध्यमांचा 15 जागा रोस्टर पूर्ण करुन रितसर शासन नियमानुसार भरती करण्यात यावी, असे ठराव करुन त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.