नववर्षाची चाहूल लागली आहे. अनेकजण अनेक संकल्प करतात. पण महत्त्वाच्या संकल्पाकडे दुर्लक्ष करतात, तो म्हणजे नववर्षातील अर्थनियोजन. त्याबाबत…
नवीन वर्षाच्या स्वागतालाच जगभरात वेगवेगळ्या रोगराईच्या बातम्या येऊन धडकत आहेत. त्यामुळे भल्या भल्या देशातील अर्थव्यवस्थेला गळती लागायला सुरुवात तर झालीच… पण त्याचबरोबर जागतिक मंदी, भाववाढ, काही देशातील युद्ध अशा अनेक समस्या सध्या उभ्या झाल्या असून यातच सामान्य माणूस भरडला जात आहे. वस्तू व सेवांचा जगभर भडिमार होत आहे. अनेक आमिषाने त्यांचा उपभोग व वापर करण्यास प्रत्येकाला मोह होत असल्याने यासाठी अर्थ म्हणजेच पैसा हे चलन यास जरुरी आहे.
हे सर्व उपभोगण्यासाठी पैशाचे माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात जगण्यासाठी जसा मनुष्याला श्वास आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा आणि पैसाच आवश्यक आहे. त्यामुळे तो कमावण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे. मराठीत एक वाक्य छान आहे- पैसा कमावणे सोपं; पण ते टिकवणं अवघड. हेच खरं आहे. कारण पैसा कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, पण मिळालेल्या पैशाचा विनियोग-वापर-अर्थनियोजन करणेसुद्धा एक कौशल्य आहे. मिळालेला पैसा हा योग्य नियोजन-गुंतवणुकीद्वारे स्वतःचा खर्च भागून आपल्या आयुष्याला शाश्वत व सुरक्षित जीवन देण्याचे काम करतो. त्याचबरोबर त्यामुळे कुटुंबाचे संरक्षण, पोषण होते आणि देशसुद्धा एक बळकट आर्थिक संपत्तीकडे वाटचाल करतो.
कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात पैशाचा योग्य विनिमय आणि योग्य वापर करून त्यापासून वेगवेगळी उत्पत्ती व निर्मिती करणेही गरजेचे वाटते. जुन्या काळी भूक लागली तर किराणा दुकानातून शेंगदाणे, फुटाणे आणि गूळ आणून पोट भरले जाई. हेच त्या काळातील इन्स्टंट फूड होतं. पण आता काळ बदललाय. परिवर्तन झाले. इतर देशातील लेज, कुरकुरे यासारखा माकड मेवा आता ग्रामीण भागातील वाडी, वस्त्यांमधील बाजारातसुद्धा नाळ घट्ट करून बसला आहे.
अमर्याद वस्तूंचा साठा देश व जगभरात वाढल्याने आपणास वर्तमान काळातील गरजा व भविष्यकाळात उद्भवणाऱ्या संभाव्य अनपेक्षित अडचणी; त्याचबरोबर जीवनात लागणाऱ्या गरजांवर चलनाची आवश्यकता याचे भान ठेवून योग्य प्रकारे मिळवलेला पैसा, याचा उपयोग करून व योग्य गुंतवणूक करून अर्थसाक्षर राहणे, हाच पर्याय सध्या तरी आहे. गरजा मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे. लालसा तर अमर्याद राहतातच. या अनुरूप आपल्याकडे काय आहे हेच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यावे. काय नाही याची यादी तर भरपूर मोठी होईल. आर्थिक कुवतीनुसार खरेदी करणे, त्याचबरोबर आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून थोडी थोडी गुंतवणूक करत राहणे. हेच आर्थिक नियोजनाचे खरे साध्य आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेचे त्याचबरोबर घडामोडीचे आपणास ज्ञान आवश्यक हवे. श्रीमंतीची बरसात करणार अशी कोणतीही जादूची कांडी जगामध्ये नाही. पैसा हा कष्ट आणि बुद्धी याच मार्गाने मिळतो. त्यामुळे अनेक कुठल्याही फसव्या योजना त्याचबरोबर आर्थिक आमिषापासून आपण दूर राहावे. येणारा पैसा व होणारा खर्च याचा सुरुवातीपासूनच आपण आढावा घेणे यशस्वी गरजेचे आहे. केवळ श्रीमंतांनीच आर्थिक नियोजन करणे, गुंतवणूक करणे असे नाही, तर प्रत्येकाला त्याची सध्याच्या काळात गरज आहे.
इथून पुढच्या काळात अर्थनियोजन व सुनियोजित जीवन यालाच महत्त्व राहणार आहे. आपल्या विघातक जीवनशैलीमुळे दवाखान्यातील दुखण्याभाण्याचा उपचार खर्च हासुद्धा वाढत आहे. पूर्वी घर-लग्न-शिक्षण याची तरतूद करणे क्रम प्राप्त होते; पण आज परिस्थिती बदलली आहे. दवाखान्याचा उपचार खर्चसुद्धा या खर्चाबरोबर समाविष्ट करणे आवश्यक वाटते. पैसा स्वतः जरी परमात्मा नसला तरी तो ईश्वराचा लहान भाऊ अवश्य आहे, असे आर्य चाणक्य यांनी म्हटले आहे. पैशाशिवाय तरी या जागतिकीकरणाच्या युगात माणसाला महत्त्व नाही आणि कोणतेही कार्य त्याशिवाय होऊ शकत नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
नव वर्षापासून आपण प्रत्येक दिवशी जमाखर्च लिहायला सुरुवात करा. अत्यल्प दोन-चार मिनिटे वेळ लागतो. पण आपण कमावलेल्या रकमेचं सिंहावलोकन निश्चित होतं. पैशाचा वापर… त्याचबरोबर योग्य गुंतवणूक, शिल्लक राहिलेल्या पैशातून बचत आणि यासाठी नियोजन ही चतु:सूत्री माणसाला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाते. केवळ ढोरमेहनत करून, घाम गाळून पैसा कमावणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण नव्हे. त्यासाठी हवे आहे योग्य आर्थिक नियोजन व स्वयं कौशल्य.