– विठ्ठल मणियार
लोकसभेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा साहेबांना असे जाणवत होते की, ज्या बहुमताने भाजप सरकार केंद्रात आले होते ते आता येणार नाही. त्यांच्या पाच वर्षांच्या चुकीच्या कारभाराचा फायदा आपण महाराष्ट्रात उठवू शकतो, आपले जास्तीतजास्त उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यानुसार आम्ही मतदार संघाचे अंदाज बांधायला सुरुवात केली. त्यावेळी आपले 12 ते 15 सीट निवडून येतील असा अंदाज होता; परंतु निकाल लागला आणि चारच जागांवर आम्हांला समाधान मानावे लागले. यामुळे पवार साहेब अजिबात “डिस्टर्ब’झाले नाहीत तर त्यांनी “असे का झाले’ या मूळ मुद्द्यावरच विचार करण्याला सुरुवात केली. त्यावेळी तरुण वर्गाला बांधून ठेवले पाहिजे त्यांना “टार्गेट’ केले पाहिजे असा प्रयत्न त्यांनी सुरू केला. या तरुणांना गांधी-नेहरू माहीत नाहीत; ते पर्याय म्हणून मोदींकडे पाहतात. त्यामुळे हाच वर्ग “टार्गेट’ करायचा असा विचार करूनच साहेब विधानसभेच्या रिंगणात उतरले.
पक्षातील अनेकवर्षे सत्ता, पद भोगलेले लोक निघून जातात. अशावेळी स्वत:च्या भवितव्यापेक्षा पक्षाचे भवितव्य काय असा विचार साहेबांनी केला. स्वत: साहेबांनी अनेक पदे उपभोगली आहेत. आमदारापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पदे त्यांनी सांभाळली आहेत. त्यामध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. परंतु जो पक्ष आपण जन्माला घातला आहे; त्याचे भवितव्य काय, असा विचार जेव्हा येतो, त्यावेळी साहेबांचा एक गुण दिसून आला की, साहेब कधीच खचून गेले नाहीत, ते शांत डोक्याने, तौलनिक विचार करतात. जेव्हा सगळे आमदार सोडून गेले त्यावेळी मलाही वाटले की “संपले सगळे’ परंतु त्यांना ते वाटले नाही. त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते.
हीच परिस्थिती 1978-79 मध्ये पुलोदचे सरकार आले तेव्हा होती. केंद्रात इंदिरा गांधी सरकार आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला;परंतु साहेबांनी त्याला विरोध केला. इंदिरा गांधी यांचा स्वभाव पाहता तेथे गेल्याने यशवंतरावांचा अपमान होईल. कॉंग्रेसमध्ये विलीन होऊन उपयोग नाही असे यशवंतरावांना त्यांनी सांगितले ; परंतु त्यांनी ऐकले नाही. साहेबांनी मात्र त्यांच्या “रामटेक’ बंगल्यावर 56 आमदारांना बोलावले आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आजच्यासारखे आमदार नजरकैदेत ठेवले नाहीत, त्यांना उलट सांगितले की, कोणाला यशवंतरवांबरोबर कॉंग्रेसबरोबर जायचे असेल तर जाऊ शकतात. त्यावेळी एकेक करत सात वगळता सर्व आमदार गेले. सातच जण राहिले. त्यामध्ये एक सुशीलकुमार शिंदे होते. त्यांनी साहेबांना सांगितले की, मी पंढरपूरच्या विठोबाप्रमाणे विटेवर उभा आहे तसा मी तुमच्यासोबत घट्ट उभा राहीन आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी शिंदे कॉंग्रेसमध्ये गेल्याचे समजले. त्यावेळी ही बातमी सांगण्यासाठी मी साहेबांकडे गेलो. त्यावेळी त्यांना ते आधीच समजले होते. त्यावर गंभीर होण्याऐवजी त्यांची प्रतिक्रिया “विठ्ठल विटेसहीत गेला’ अशी हजरजबाबीची होती. इतक्या “टेन्शन’मध्ये हा माणूस असा कसा विचार करू शकतो, याचे मला त्यावेळी आश्चर्य वाटले होते.
सहाच आमदार आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत, अशा परिस्थितीत एखादा माणूस “डिस्टर्ब’ असतो, “टेन्शन’मध्ये असतो; पण साहेबांनी वरील कॉमेंट केली. त्यांचा हाच वेगळा गुण होता. अशा परिस्थितीत ते “डिप्रेस’ झाले नाहीत तर त्यांनी मार्ग काढला. राजकीय असो किंवा कौटुंबिक असो त्यांनी धीरगंभीर, शांतपणे, विचारपूर्वक निर्णय घेतले. त्यांचे आजपर्यंतचे निर्णय 99.99 शतांश टक्के कधीच चुकले नाहीत. ते कधीच खचून गेले नाहीत तर त्यांनी त्यातूनही मार्ग काढला.
सहाजणांना घेऊन त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली. महाराष्ट्रात त्यांनी दौरे केले. 1985 च्या निवडणुकांमध्ये 54 आमदार निवडून आणले. त्यांना सोडून जे गेले त्यातल्या 90 टक्केंना त्यांनी पाडले आणि आपले आमदार निवडून आणले. तीच इतिहासाची पुनरावृत्ती आता विधानसभेवेळी झाली.
या 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकांतही त्यांनी जे उमेदवार निवडले ते जाणीवपूर्वक निवडले. जे खूप वयस्कर नाहीत, तरुणवर्ग आहेत. ज्यांना संधी दिली तर चांगले काम करू शकतील असे ते होते. खचलेल्या कॉंग्रेसलाही त्यांनी बरोबर घेतले त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
कष्टांच्या बाबतीत साहेब कधीच तडजोड करत नाहीत. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर, त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. ते ब्रीचकॅन्डीत दाखल झाले. ऑपरेशन झाले. डॉ. बापट जे त्यांचे “फॅमिली डॉक्टर’ होते. त्यांना साहेबांनी चिठ्ठी पाठवली. बोलता येत नसल्याने साहेबांनी त्यांना चिठ्ठीतून विचारले की, ऑपरेशनवेळी तू तिथे होतास तर माझे आयुष्य किती आहे हे सांग. ती चिठ्ठी दिली तेव्हा आम्ही त्या रूममध्ये होतो. त्यावेळी डॉ. बापट यांनी उत्तर दिले की, ऑपरेशन 100 टक्के यशस्वी झाले आहे. तिथे कॅन्सरचा एक कणही नाही. त्यामुळे तुम्ही जगाल तितके तुमचे आयुष्य आहे.
बरे झाल्यावर मी साहेबांना विचारले की, तुम्ही असे का विचारले? तर त्यांनी उत्तर दिले की, माझ्या हातात किती काळ आहे त्यावर मी जे काही ठरवले आहे ते मला किती स्पीडने करावे लागेल हा विचार माझ्या डोक्यात आहे. राज्य, लोक, देशासाठी मला आणखी काम करायचे आहे असे उत्तर त्यांनी दिले. त्यावेळी असे जाणवले की, माणूस “मरणाच्या बाबतीतही असा विचार करू शकतो. केवळ लोकांचाच विचार करतो आणि मरणालाही घाबरत नाही’ हे दिसून येते. त्यांचे संपूर्ण राजकारण पाहिले तर त्यांच्यावर खूप टीका झाली, नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला, अनेक आरोप झाले. मात्र त्यांनी त्याला कधी उत्तर दिले नाही.
एका सार्वजनिक कार्यक्रमात साहेबांनी सांगितले की, माझे वय झाले आहे पण मी म्हातारा झालो नाही. तुमचे वय किती आहे हे विचारात घ्यायचे नाही मन किती तरुण आहे हे विचारात घ्यायला हवे. मी तुमच्या ताकदीने आज काम करू शकतो हे साहेबांनी त्यावेळी सांगितले.
2019 च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी विदर्भाचा दौरा काढला, त्यानंतर त्यांची सोलापूरची आणि त्यापाठोपाठ घेतलेली साताऱ्याची सभा पाहिली, तरुणांचा उत्साह पाहिला या सगळ्या गोष्टी साहेबांना अधिक उत्साह देत राहिल्या. जे सोडून गेले त्या लोकांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. 40 वर्षांमध्ये त्यांनी सत्ता उपभोगली, त्यांना साहेबांनी अनेक गोष्टी दिल्या. केवळ सत्ताच पाहिजे म्हणून निघून गेलेल्यांवर साहेबांनी टीका केली. साताऱ्याचा तर प्रकार औरच होता. श्रीनिवास पाटील यांनी ठरवले होते की, आता पक्षाचेच फक्त काम करायचे; परंतु साहेबांनीच त्यांना लढायला सांगितले.
साताऱ्यात उदयनराजेंना साहेबांनी खूप सांभाळले. त्यांच्या कुटुंबात साहेबांना मानले जाते. त्यांचे सोडून जाणे हा साहेबांना धक्का नव्हता ते काहीही करू शकतात हे साहेबांना माहीत होते. केवळ साताऱ्यात नव्हे तर जिल्ह्यातील लोकही साताऱ्यातील सभेला आले. श्रीनिवास पाटलांचे नशीब की, “त्या’ प्रचार सभेच्यावेळी पाऊस सुरू झाला. तिथे साहेबांचा “प्रेझेन्स ऑफ माईंड’ पहायला मिळाला. एवढा पाऊस येत असतानाही डोक्यावर खुर्च्या घेऊन लोक ऐकताहेत अशावेळी “भिजेन’ म्हणून सभा सोडून जाणे योग्य नाही असे साहेबांना वाटले. त्यांनी छत्री नाकारली आणि त्या पावसात त्यांनी भाषण केले. श्रीनिवास पाटलांनाही ते लक्षात आले आणि ते साहेबांच्या शेजारी जाऊन उभे राहिले. तो जो पाऊस होता तो “विजयचा वर्षाव’च होता असे मी म्हणेन. त्यामुळेच केवळ साताऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक फिरली.
त्या आधी “ईडी’चा प्रकार घडला. साहेबांनी त्या प्रकरणातही सरकारला धीरगंभीरपणे राहून “चॅलेंज’च दिले. सरकार बदला घेण्याच्या भावनेने वागत आहे हे त्या “ऍक्शन’मधून लोकांना दाखवून दिले. त्यांच्या पायाला जखम होती त्याची फिकरही त्यांनी केली नाही. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे साहेबांनी या निवडणुकीतून दाखवून दिले. तुमचे मत पटवून देण्याची ताकद जर तुमच्यात असेल तर तुम्ही जिंकून येऊ शकता हे उदाहरण सगळ्यांपुढे साहेबांनी घालून दिले.
साहेब चांगल्या प्रकारे हे सरकार चालवतील. “रिमोटकंट्रोल’ असे मी म्हणणार नाही. योग्य सल्ला देतील. जेथे खटकेल तेथे सांगतील; परंतु या सगळ्यात माझे मत असेल की, साहेब पुन्हा राज्यसभेत जावेत. त्यांची तेवढी ताकद आहे. त्यांची उमेद आहे, इच्छाशक्ती आहे. शारीरिक ताकद चांगली आहे. देशाला आणि राज्याला त्यांनी तिथे राहण्याचा उपयोग होईल. फेब्रुवारी 2020 पर्यंत त्यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे अशी मी त्यांना विनंती करेन.
(शब्दांकन – अंजली खमितकर)