सातारा – मराठा समाजावर नव्हे तर कोणावरही अन्याय होत असेल तर मी राजीनामा देईन. कोण चुकले कोण नाही, या तपशीलात मला जायचे नाही. मला कोणत्याही पक्षाचे लेबल लावू नका. मी कधीच कुठल्या गोष्टीचे राजकारण करत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
येथील जलमंदिर या निवासस्थानी उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, “पहिल्या चार जाती होत्या. ब्राम्हण, क्षत्रिय, वैष्णव, क्षुद्र. त्यानंतर पोटजाती निर्माण झाल्या. जात म्हणजे जाता जात नाही ती जात.’ लहानपणी गोट्या खेळताना, विटी दांडू खेळताना तुम्ही कोणाची जात बघितली होती का. मग आताच का, असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी केला. श्रेयवाद कोणी घेऊ नये आणि करु पण नये.
प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवावी. न्याय मिळत नसेल तर उद्रेक होणारच. आत्ता श्रेयवाद कोण घेत आहे याच्याशी मला देणे घेणे नाही, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारकडून हे न झाल्यास तुम्ही काय करणार यावर उदयनराजे म्हणाले, “मी कधीच कोणत्या गोष्टीत राजकारण करीत नाही. आघाडी बिघाडी तिघाडी यांनी ते करुन दाखवावे. आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाही तर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार.’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच.
फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काही होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग, असा सवाल उदयनराजेंनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर चुप्पी साधली आहे, याविषयी उदयनराजे यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवार राजकारणात ज्येष्ठ आहेत. त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण एखाद्या विषयावर मी बोलतो तेव्हा ते तळमळीने बोलतो, मराठा आरक्षणावर मी स्पष्ट भूमिकेत आहे. आता या विषयावर पवार का बोलत नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा.’