पुणे – हडपसर, मांजरी आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांतील काही भागांत “कोयता गॅंग’ने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हेगार रात्री-अपरात्री कोयता दाखवून चोरी, वाहनांची तोडफोड, लुटमार करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ मोक्का लावा, तडिपार करा, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. सध्या शहर आणि इतर परिसरात कोयता गँगने प्रचंड धुडगूस घातला असून, सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेयांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं आहे. “राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे.
राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांसाठी आणि वृद्धांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.