शिरूर, खेडचा शेतकरी यंदा चिंताग्रस्त : 18 टक्के पाणीसाठा
केंदूर (वार्ताहर) – खेड आणि शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणात 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत धरणात 99 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. चासकमानच्या पाण्यासाठी यंदाही शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे ऐन पावसाळ्यात दिसत आहेत.
खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चासकमान धरणामुळे सुबत्ता आली आहे. दरवर्षी जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरण निम्म्याहून अधिक भरलेले असते. मात्र, यंदा पावसाने जून महिन्यात हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा दडी मारल्याने धरणात अवघा 18 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
दरवर्षी चासकमानच्या पाण्यासाठी कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. 100 टक्के धरण भरले तरी लोकप्रतिनिधींच्या राजकीय स्वार्थासाठी काही शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. धरण भरल्यानंतरही नियोजनाच्या अभावामुळे करंदी, जातेगाव, शिक्रापूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, सणसवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागते. स्थानिक पदाधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहात नाही, त्यामुळे यंदा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून चासकमानच्या पाण्याचा प्रश्न या गावांना सतावत आहे. मात्र, यात स्थानिक पदाधिकारी नेत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे.
यंदाही करावी लागणार वणवण
गेल्यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, यावर्षी धरणातच पाणी शिल्लक नसल्याने पाण्यासाठी पुन्हा वणवण करावी लागते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
आंदोलनात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उणीव
दरम्यान, शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला चासकमानच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनातून लढा सुरू केला होता. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन धुडकावून लावले. लॉकडाऊनच्या काळात दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत हे आंदोलन पोहोचले. यानंतर अखेर शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आहे. मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना पाणी मिळाले. शेतकऱ्यांनी एवढे आक्रमक आंदोलन छेडले, मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. किमान यापुढे तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.