मुंबई – अनिल अंबानी संचलित रिलायन्स समूहातील रिलायन्स कॅपिटल या कंपनीच्या संचालक मंडळाकडून कारभार रिझर्व बॅंकेने काढून घेतला आहे. त्याचबरोबर या कंपनीवर रिझर्व बॅंकेने आपला प्रशासक नेमला आहे.
रिलायन्स कॅपिटल या बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थेने काही देणी चुकती केलेली नाहीत. या कंपनीच्या कार्पोरेट गव्हर्नंसमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाच्या जागेवर रिझर्व बॅंकेने नागेश्वरराव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
नागेश्वरराव या अगोदर महाराष्ट्र बॅंकेत कार्यकारी संचालक होते. रिझर्व बॅंक लवकरच रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात नादारी आणि दिवाळखोरी कायद्यानुसार कार्यवाही सुरू करणार आहे. रिझर्व बॅंक यासंदर्भात राष्ट्रीय कंपनी लवादासमोरही आपली भूमिका सादर करणार आहे.
या अगोदर दोन कंपन्याविरोधात रिझर्व्ह बॅंकेने अशी कार्यवाही केली आहे. या कंपनीवर 40 हजार कोटी रुपयाचे कर्ज आहे. कंपनी हे कर्ज परत करू शकणार असे रिझर्व्ह बॅंकेला वाटते. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला तब्बल 1,156 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी या कंपनीला 9,287 कोटी रुपयाचा तोटा झाला होता.