मुंबई – राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे रॅकेट, तसेच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे. मुख्यमंत्री जर इतक्या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं करावे, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात करोनाचा उद्रेक झाला असतानाही राज्य सरकारकडून योग्य कार्यवाही केली जात नाही. राज्य सरकारच्या अपयशाची अशी शंभर प्रकरणे राज्यपालांच्या निदर्शनाला आणून दिली गेली आहेत. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी यासंदर्भात हस्तक्षेप करत अहवाल मागवावा, अशी मागणी शिष्टमंडळानं केल्याचे फडणवीस यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आदी नेत्यांचा समावेश होता.