नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. समाजसेवेचा एक आदर्श वसा त्यांनी महाराष्ट्रात स्थापित केला आणि आजही वंचित, पीडितांच्या सेवेला त्यांनी स्वत:ला समर्पित केले आहे.#PadmaAwards
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 25, 2021
त्यानंतर, सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, की’, असं काही तरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेत, असे त्यांनी पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं. या पुरस्कारानंतर सिंधुताई सपकाळ यांचं मुख्यंमत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही अभिनंदन केलंय.
दरम्यान, सिंधूताई यांच्यासह सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, साहित्याबद्दल नामदेव कांबळे यांना, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे यांना, उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्यापार व उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.