(डॉ. राजू पाटोदकर) – प्रत्येक भारतीयाच्या मनात, हृदयात आहे तो आपला तिरंगा ध्वज. उंच आसमंतात फडकणाऱ्या या ध्वजाकडे पाहिले तरी आपली छाती अभिमानाने भरून येते आणि कळत नकळत त्या ध्वजाला सलाम देण्यास हात उंचावतो… ओठी बोल येतात…
सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्ता हमारा…
26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन, हे राष्ट्रीय सण. या दिवशी हमखास आपल्या कानावर देशभक्तीपर गाणी पडतात. यात प्रामुख्याने उर्दू कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले “सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे गीत असते. 16 ऑगस्ट 1904 रोजी सर्वप्रथम प्रसिद्ध झालेले तमाम भारतीयांच्या हृदयातील हे गीत आहे.
देशभक्तीपर गीतांमध्ये लोकप्रिय असे गीत म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पाणी, जो शहीद हुऐ है उनकी, जरा याद कुर्बानी’. कवी प्रदीप यांची गीतरचना, संगीतकार अण्णासाहेब चितळकर म्हणजे सी. रामचंद्र यांचे संगीत आणि लतादीदींचा आवाज असे ग्रेट कॉम्बिनेशन असलेले हे गीत. सर्वप्रथम नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर 27 जानेवारी 1963 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासमोर जेव्हा लतादीदींनी हे गीत सादर केले त्यावेळी पंडितजींना आपले अश्रू रोखता आले नाही. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील “कर चले हम फिदा, जान वतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथीयो’ हे गीत ऐकताना व पाहताना आपल्या मनात देशभक्ती जागृत होतेच. कैफी आझमी यांच्या लेखनीतून उतरलेल्या या गीताला मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले आहे.
आपल्याला जल्लोषात आणणारे एक गीत म्हणजे 1957 या वर्षी प्रदर्शित झालेल्या “नया दौर’ या चित्रपटातील “ये देश है वीर जवानो का, अलबेलो का मस्तानो का, इस देश का यारो ओय… इस देश का यारो क्या कहना, ये देश हे दुनिया का गहना’ हे होय. साहिल लुधियानवी यांच्या लेखनीतून निर्माण झालेले हे गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील असून ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले आहे, तर दिग्दर्शक बी. आर. चोप्रा. आपल्या देशाचे अतिशय सुंदर वर्णन करणारे एक गीत म्हणजे 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या “सिंकदर-ए-आजम’ या चित्रपटातील “जहॉं डाल डाल पर सोने की चिडियॉं करती है बसेरा, वो भारत देश है मेरा.’ संगीतकार हंसराज बहल यांनी दिलेले या गीताचे संगीतही उत्कृष्टच आ गीतकार राजेंद्र कृष्ण म्हणतात, “जहॉं सत्य, अहिंसा और धरम का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’. 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या “उपकार’ या चित्रपटातील “मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती’. किती सुरेख आणि समर्पक असे देशाचे वर्णन गीतकार गुलशन बावरा करतात. या गीतात फडकत्या तिरंगा ध्वजाचे वर्णन करताना अप्रतिम उमपा दिली आहे. “रंग हरा हरिसिंह नलवेसे, रंग लाल हेै लाल बहादूर से, रंग बना बसंती भगतसिंग, रंग अमन का विर जवाहरसे’ उत्कृष्ट असे चित्रीकरण असलेले हे गीत असून मनोज कुमार यांच्यावर हे चित्रीत करण्यात आलेले आहे.
“लिडर’ या चित्रपटातून दिलीप कुमार आणि वैजंयतीमाला यांच्यावर चित्रीत झालेले “अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही, सर कटा सकते है लेकिन, सर झुका सकते नही’ हे गीतही देशभक्तीपर गीत म्हणून प्रसिद्ध आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार शकील बदायुनी तर संगीतकार नौशादजी आहेत. मनिरत्नम यांनी 1992 मध्ये प्रदर्शित केलेल्या “रोजा’ चित्रपटात हरिहरन यांच्या आवाजात असलेले “भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है, सदियो से भारत भूमी दुनिया की शान है, भारत मॉं की रक्षा मे जीवन कुर्बान है’ हे गीत लोकप्रिय झाले.
सुभाष घई दिग्दर्शित “कर्मा’ चित्रपटात “हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ हे गीत आहे. मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील या गीताचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. दिलीप कुमार, नूतन, दारासिंग, मुक्री आदी कलावंतावर चित्रीत असलेले हे गीत पाहताना व ऐकताना आनंद मिळतो.
मनोज कुमारचा “शहीद’, बॉबी देओलचा “शहीद भगतसिंग’ आणि अजय देवगणचा “दि लिजेंड ऑफ भगतसिंग’ या तिन्ही चित्रपटांत क्रांतिवीर भगतसिंग यांचे जीवनचरित्र आहे. यातील 2002 या वर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटात “मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे’ हे सोनू निगम यांच्या आवाजातील उत्कृष्ट असे देशभक्तीपर गीत आहे. गीतकार समीर, संगीतकार ए. आर. रहेमान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी असे हिट त्रिकुट या चित्रपटाच्या यशास मदतीला होते. अशा प्रकारची बरीच राष्ट्रभक्तीपर, देशभक्तीपर गीते आहेत. त्यातील काही प्रातिनिधिक गीते या लेखात आहेत. मात्र एक नक्की की, देशभक्तीपर असलेले प्रत्येक गीत हे भारतीयांच्या मनात, ओठावर निश्चितच रुळलेले असेच आहे.