नवी दिल्ली – यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य् सोहळ्यासाठी सूरीनामचे भारतीय वंशाचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे मुख्य अतिथी म्हणून असण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केल्याच्या पार्श्वभुमीवर संतोखी यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये वाढीस लागलेल्या करोनाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये नव्याने लॉकडाऊन जाहीर केला असून अधिक कठोर उपाययोज्नांचे सूतोवाचही केले आहे. तेथील करोनाच्या आपत्तीमुळे जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याबद्दल असमर्थता व्यक्त केली असल्याने सूरीनामच्या अध्यक्षांना या सोह्ळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
मात्र संतोखी यांच्याकडून या सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले गेल्याचे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने संतोखी हेच प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी राहणार असल्यचे वृत्त प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे.
चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी गेल्या वर्षी 16 जुलै रोजी सूरीनामच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. भारतीय वंशाचे असल्याने संतोखी यांनी शपथविधीच्या समारंभाच्यावेळी हातात वेद ग्रंथ धरून संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. शपथविधीच्यावेळी पुरोहितांकडून वेदमंत्रोच्चारही केला गेला होता. पुरोहितांच्या बरोबर संतोखी यांनीही हे संस्कृत मत्रोच्चार केले होते.
एकच दिवस आगोदर प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आयोजित समारंभात संतोखी यांनी भारत आणि सूरीनामच्या प्रवासी नागरिकांच्या मुक्त प्रवासासाठी आग्रही प्रतिपादन केले होते. द्विपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये वाढ करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती.
भारताबरोबरचे संबंध वाढवण्यासाठी भारतीय प्रवाशांसाठी सूरीनाम भेटीसाठी “व्हिसा परमिट’ समाप्त करण्यासाठी संतोखी यांनी पुढाकार घेतला होता. उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील दोन्ही देशांमधील संबंध अधिक व्यापक करण्यास वाव असल्याचेही संतोखी यांनी म्हटले आहे. सूरीनाम आणि भारत हे एकमेकांसाठी “सॉफ्ट पॉवर’ असल्याचेही ते म्हणाले होते.
19 व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीयांना सूरीनाम येथे मजूरीसाठी नेले गेले होते. हा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक वारसा आहे. 148 वर्षांपूर्वीपासूनचा हा वारसा आपल्याला आई-वडिलांकडून आणि आजी आजोबांकडून मिळालेला आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि कोलकाता मार्गे सुरू झालेल्या प्रवासातूनच आपण सूरीनाममध्ये येऊन पोहोचलो असल्याचेही संतोखी म्हणाले होते.