मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त्त छत्रपती शिवाजी पार्क मैदान,दादर मुंबई येथील शासकीय कार्यक्रमादरम्यान भाषण केले.यावेळी त्यांनी विवध विकास कामे आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत भाष्य केले. कोश्यारी यांनी सुरुवातील प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यानंतर कोश्यारी यांनी नाव घेत सर्व महापुरुषांना अभिवंदन केले.
“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो” असं कोश्यारी यावेळी म्हणाले. “स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दहा हजार रुपये वाढ केली असून आता ते वीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे. पाच हजार चारशे सहा स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ होणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
- राज्यपालांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंचाहत्तर हजार रिक्त पदे भरत असून नुकतीच याची सुरुवातही करण्यात आली आहे. राज्यातील अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. - माझ्या शासनाने नुकताच मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जोडले गेले आहेत.
- आणिबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा देखील सन्मान / गौरव करण्याबाबतची योजना पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहे.
- मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाटात नवीन मार्गिका बांधत आहोत. वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ठाणे खाडी प्रकल्प, पुणे शहराभोवतीचा चक्राकार वळण मार्ग प्रकल्प, ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, वर्सोवा – विरार सागरी मार्ग प्रकल्प, रायगड जिल्हा ते सिंधुदूर्ग जिल्हा सागरी महामार्ग, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.
- माझ्या शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग’ या नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे.
- मुंबई तसेच नागपूर, पुणे, ठाणे भागातील मेट्रो मार्गांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने करण्यात येत आहेत. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच मेट्रो मार्ग दोन अ आणि मेट्रो मार्ग सात वरील दुसरा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मेट्रो मार्ग एक, दोन अ आणि सात हे परस्पर एकमेकांशी जोडले गेल्यामुळे मुंबईला पहिले मेट्रो नेटवर्क मिळाले आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प (एमटीएचएल), कोस्टल रोड यासह मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे.
- विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये डिसेंबर 2022 मध्ये शेहचाळीस हजार एकशे चौपन उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.