नगर – लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेली शासन पद्धती, म्हणजे लोकशाही अशी लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केली. पण, लोकशाहीत लोकांची कामे होतात का ? हा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.
केवळ निवडणुका आल्या की, राजकीय नेते, पुढारी नागरिकांचे उंबरठे झिजवतात. आणि एकदा निवडून आल्यावर पाच वर्षे सामान्य माणसाला कुणी विचारत नाही. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांशी निवडणुका, राजकारण, विकास यासंदर्भात साधलेला हा संवाद…
लोकप्रतिनिधींनी दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सोयी- सुविधा, आणि उपजीवेकेसाठी रोजगार निर्माण करायला हवा होता. पण तसं झालं नाही.
राजकारण्यांनी जाती-पातीच, धर्माच राजकारण करून माणसामाणसात फूट पाडण्यापेक्षा माणसांना माणसांसारखं जगू द्यावं, यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रश्नावर लोकप्रतिनिधीनी काय केले? यावर काम झालं पाहीजे.
प्रमोद तांबे,नागरिक
आमचे प्रश्न फार नाहीत. साध्या अपेक्षा असतात सामान्य माणसाच्या. पण, त्या सामान्य प्रश्नांची लोकतिनिधी परिपूर्ती करू शकले नाही. शहरात चांगले रस्ते नाहीत.
आरोग्य विषयक सुविधा नाही. राजकारणी लोक केवळ स्वार्थी वृत्तीने राजकारण असतात. आपल्याला जनतेने निवडून दिलं, मग जनतेची कामे करावी लागतील, हे त्यांच्या गावीही नसतं. त्यामुळे नव्या चेहऱ्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे ही गरज बनली.
विनोद कदम, नागरिक
अहमदनगर शहराचा विकास व्हायचा असेल तर शहराला विकासाची दृष्टी असलेला लोकप्रतिनिधी असला पाहिजे, सध्या शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली असुन सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यावर दोन्ही बाजूने उतार पाहिजे हा साधा नियम कोणी पाळत नाही, लोकप्रतिनिधीनां ही समज असली तर शहरातील रस्ते खराब होणार नाहीत.
ज्या शहरात साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात ते शहर चालतं बोलतं शहर असते. येथील लोकप्रतिनिधी साधे नाट्यगृह उभारू शकले नाहीत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विकासाची दृष्टी असलेला, सर्वसामान्य जनतेच्या समश्या ऐकून घेणारा, औद्योगिक वसाहत वाढण्यासाठी प्रयत्न करणारा सहज उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे.
सुनील गोसावी, संस्थापक, शब्दगंध साहित्य परिषद
नागरी सुविधा पूर्ण करून सांस्कृतिक विकास ला प्राधान्य देऊन करणारा नेता पाहिजे. कारण, शहराचा सांस्कृतिक वर्तमान ह्यावरून शहराची ओळख बनते.
श्रीपाद दगडे, नागरिक
आज राजकारण म्हणजे मूठभर प्रस्थापित लोकांचा धंदा उत्पादनाचे साधन बनलेले आहे. त्यामुळे निवडणूकीमधे प्रस्थापित पक्ष त्यांचे व उमेदवार हे मतदारांपर्यंत प्रत्यक्ष न पोहोचता निवडणूकीच्या 1-2 दिवस अगोदर पैसे वाटतात आणि निश्चिंत राहतात, त्यांना जन मतापेक्षा धन मतावरच जास्त विश्वास आहे.
प्रवीण सोनवणे नागरिक
गेल्या तीस वर्षात शहरातील लोकप्रतिनिधींना शहराचा विकास करता आला नाही. आम्हाला खरंतर शहराचा विकास घडवून आणणाऱ्या नवनीत बार्शीकर यांच्या सारखा प्रतिनिधी हवा.
मात्र, विकास कामे करेल, असा एकही उमेदवार सध्या रिंगणात दिसत नाही.
सुनील भोर, नागरिक
नगरच्या स्थानिक प्रश्नांना लोकप्रतिनिधींनी प्राधान्य दिलं पाहिजे. तसं झाले तरच शहराचा विकास होऊ शकतो. पंचवीस वर्षे सत्ता असतांना देखील लोकप्रतिनिधींना शहराचा विकास साधता आला नाही.
हरिभाऊ राऊत नागरिक