यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून शुक्रवारी २५ जून ते २८ जूनपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसे आदेश प्रशासनाने काढले असून शुक्रवारी सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी किराणा दुकानासमोर रांगा लावल्या आहेत.
दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे काही दुकान चालकांनी पोलिसांच्या भीतीने दुकाने बंद केली आहेत. आज १६ कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला असून, सविस्तर माहिती जाणून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यवतमाळमध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली आहे.
दरम्यान, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातून ६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना चिकलठाणा येथील (मिनी घाटी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबादेत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२ वर गेला आहे. मिनी घाटीत आज एकूण 113 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.