नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी पालकमंत्री आदिती तटकरेंचे आवाहन
रायगड – करोना व्हायरस बाधित रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील करोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट आज निगेटीव्ह आल्याने त्या व्यक्तिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यातील परदेशवारी करून आलेल्या एका व्यक्तिला मागील काही दिवसांपासून करोनाची लागण झाल्याने त्याचावर मुंबई येथील भाभा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सदर व्यक्तिला सुरवातीला मुंबई येथील कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या करोनाबाधित रूग्णावर डाॅक्टरांनी केलेल्या उपचारामुळे आज त्याचे सॅम्पल रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर एका करोना बाधित रूग्णावर कस्तूरबा हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात अजूनही उपचार सुरू आहेत.
या दरम्यान एका रूग्णाच्या करोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या हि चिंताजनक बाब आहे. नागरीकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला त्याची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुरू राहणार असून नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.