हिमांशू
“हमारी इतनी बदलियों के बाद भी हम नहीं बदले,’ असं म्हणणारा अंग्रेजों के जमाने का जेलर आठवतोय? “भारत भ्रमण करने का इससे अच्छा तरीका और क्या हो सकता है,’ अशा शब्दांत वारंवार होणाऱ्या बदल्यांवर टिप्पणी करणारा “सत्या’मधला पोलीस आयुक्त आठवतोय? पंधरा वर्षांत सोळा बदल्या झालेले बरेच पोलीस अधिकारी आपल्याला रूपेरी पडद्यावर आजवर दिसलेत. तरीसुद्धा “जिथं माझं पोस्टिंग ते माझं गाव,’ असे डायलॉग हे अधिकारी मारत असतात.
सिनेमातले अधिकारी अत्यंत कर्तव्यतत्पर आणि कडक असतात आणि एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणाची उकल करताक्षणी त्यांच्या हातात बदलीची ऑर्डर पडते, हा ठरलेला सीन असतो. बाजीराव सिंघमला “आपल्या एरियात’ आणण्यासाठी राजकीय क्षेत्रातलं वजन वापरणारा माफिया जयकांत आपण पाहिला आणि मुख्यमंत्र्याच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यामुळे सक्तीच्या रजेवर जावं लागलेला एसीपी पृथ्वीराजसुद्धा पाहिला.
तात्पर्य, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा केवळ राजकारणी मंडळींच्याच नव्हे तर बॉलीवूडच्या दृष्टीनेही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. थंड पडलेल्या राजकारणाला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या विषयावरून उकळी फुटते. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा मीडियाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. या विषयात जनसामान्यांना फारशी रूची नसली, तरी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती कोठे होते, यावर बारकाईनं लक्ष ठेवणारा, नव्या अधिकाऱ्यांच्या स्वागताला हारतुरे घेऊन जाणारा एक वर्ग सर्वत्र दिसतो.
“महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही,’ असं वारंवार सांगणाऱ्या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये “अधिकाऱ्यांच्या बदल्या’ हा विषय मात्र तणावाचा ठरला. मुंबईतल्या दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून केवढा गोंधळ उडाला, हे सर्वांनी पाहिलं. नीरस, एकसुरी आणि बेचव झालेल्या राजकारणाला या विषयामुळे चरचरीत फोडणी मिळाली. काही बदल्यांना स्थगिती देण्याची वेळ ओढवली आणि त्याचीही खमंग चर्चा झाली.
“आधी चर्चा; मगच बदल्या’ असं सूत्रही नुकतंच ठरल्याचं समजलं. या निर्णयापूर्वी “इकडचे नगरसेवक तिकडे’ आणि “तिकडचे पदाधिकारी इकडे’ अशा कसरतींमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला होता. त्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे आणखी वाढ होऊ नये म्हणून शरद पवार रिंगणात उतरले. गृहमंत्र्यांना भेटले. त्यांना घेऊन “मातोश्री’वर गेले. या सगळ्या प्रवासाच्या “कळते-समजते’ बातम्या झळकल्या.
“मातोश्री’वरच्या चर्चेत आणखी दोन-तीन मंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपद एका पक्षाकडे आणि गृहमंत्रिपद दुसऱ्या पक्षाकडे असल्यावर एवढं चालायचंच! म्हणूनच बहुधा गृहमंत्रिपद दुसऱ्या पक्षाकडे सोडाच; दुसऱ्या व्यक्तीकडेही द्यायला सहजासहजी कुणी राजी नसतं. असो! मुद्दा एवढाच, की बदल्या रद्द झाल्यामुळे नव्या नियुक्तीच्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना भेटायला हारतुरे घेऊन जाऊ इच्छिणाऱ्यांचे मनसुबे तूर्तास तरी लांबणीवर पडले.
“बदल’ हाच जीवनाचा स्थायीभाव आहे, हे नवतत्त्वज्ञान जोपासणाऱ्या सध्याच्या जगात “बदल’ आणि “बदली’ या न बदलणाऱ्या गोष्टी! “बदल’ हा काहीजण “फायद्याचा’ म्हणून घडवतात तर बहुतांश लोक “अपरिहार्य’ म्हणून स्वीकारतात. बदल्यांचंसुद्धा गणित जवळजवळ तसंच आहे. काहींना ती फायद्याची वाटणार आणि अनेकांना अपरिहार्य वाटणार, हे ओघानं आलंच. “बदल’ आणि “बदल्या’ सुरूच राहणार. बदलणार नाही ते बदल्यांचं राजकारण! …आणि हो… “इतनी बदलियों के बाद’ न बदलणारी माणसं!