बारामती -संचारबंदी असताना देखील शहरात विनाकारण फिरणाऱ्या 27 जणांना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच 25 दुचाकी जप्त केल्या आहेत. जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमधील कलम पाच अन्वये सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर फौजदारी दंड संहिता कलम 144अन्वये संचारबंदी लागू केले आहे.
कोणीही विनाकारण रस्त्यावर मोटरसायकलवरून फिरू नये अगर चौकामध्ये गर्दी करू नये. रस्त्यावर गर्दी आहे की नाही हे पाहण्याकरता लोक रस्त्यावर येत आहेत.
नागरिकांच्या सुविधाकरता दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, फळ मार्केट, भाजी मार्केट इतर अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आलेले आहेत; परंतु असे निदर्शनास आले आहे की, कोणतेही कारण नसताना लोक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत.
त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. जर लोकांनी सहकार्य केले नाही तर संचार बंदीचे उल्लंघन म्हणून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे औदुंबर पाटील यांनी स्पष्ट केले.