नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया कृषी कायदे रद्द केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
देशात लागू केलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. हे कायदे रद्द केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”
गेल्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महामोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. देशातील शेतकर्यांना विशेषत: लहान शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश होता.
वर्षानुवर्षे देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत व पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे.
आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे.