अट्टारी – भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी 6 पाकिस्तानी युवकांची त्यांच्या देशात परत पाठवणी केली. त्या युवकांनी शुक्रवारी अनवधानाने भारतीय हद्दीत पंजाबच्या क्षेत्रात शिरकाव केला. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडलेल्या त्या युवकांना बीएसएफच्या गस्ती पथकाने पकडले.
त्यानंतर बीएसएफबरोबरच स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे कुठलीच आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू आढळली नाही. दोन्ही देशांच्या हद्दीची माहिती नसल्याने चुकून त्यांनी सीमा ओलांडल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, बीएसएफने त्यांना पाकिस्तान रेंजर्सकडे सोपवले. पाकिस्तानी नागरिकाने भारतीय हद्दीत घुसू नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची तंबीही पाकिस्तान रेंजर्सला देण्यात आली.