येरवडा, दि. 2 (प्रतिनिधी) -महापालिकेच्या अनुसयाबाई सावंत आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेच्या साफसफाईला येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने सुरुवात केली आहे. “प्रभात’ने शाळेची दुरवस्था झाल्याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच मनसेचे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी करून आवश्यक ती कामे करण्यास सुरुवात केली तसेच येथील शाळेच्या ज्या समस्या असतील त्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन क्षेत्रीय अधिकारी वैभव कडलक यांनी दिले.
येरवडा प्रभाग क्र. 6 मधील पालिकेच्या सहा शाळा आहेत. या प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह आणि पाण्याच्या समस्या होत्या. शाळेच्या प्रवेशद्वारावरच चिखलाचे साम्राज्य झाले होते. ड्रेनेजचे मोठे झाकण तुटले आहे अनेक वर्गखोल्यातील वीज बंद तसेच वायरिंग तोडलेली होती. बाहेरील मुलांचाही शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना त्रास होत होता. “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेत अधिकाऱ्यांनी त्वरित काम सुरू केले. आठ दिवसांपासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते ते काम तत्काळ करण्यात आले, शाळेच्या मैदानावर चिखल झालेल्या जागी मुरुम टाकण्यात आला, वर्गखोल्यांतील वायरिंग नव्याने बसविण्यात आली, स्वच्छतेचे कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला तसेच येरवडा पोलीस स्टेशनचे बीट मार्शल दिवसातून येथे गस्त घालतील याची व्यवस्था करण्यात आली. “प्रभात’ने शाळेची दुरवस्था मांडून प्रशासनाला जागे केले, याबद्दल येथील शिक्षकांनी आणि पालकांनी आभार मानले.