सोमेश्वरनगरजवळ काटेरी झुडपांचा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा
वाघळवाडी (वार्ताहर) – बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या नीरा डावा कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या कालव्यामुळे येथील क्षेत्र ओलिताखाली येऊन हा भाग बागायती झाला आहे.
या कालव्याच्या पाण्यावर या दोन तालुक्यातील अनेक उद्योगधंदे, कारखाने अवलंबून आहेत. आता याच नीरा डाव्या कालव्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. ही काटेरी झुडपे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून नीरा डावा कालव्याच्या दुतर्फा असणाऱ्या भरावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्याच्या भरावावरील मुरूम वाहून गेला आहे. भविष्यात कालवा फुटण्याची घटना घडण्याची दाट शक्यता आहे.