पाणी गळती थांबणार; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
धनंजय घोडके
वाई – वाई तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या कालव्यांच्या दुरुस्तीला सध्या चांगलाच वेग आला आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. मात्र आता कालव्यांची दुरुस्ती झाल्यामुळे पाणी गळतीलाही ब्रेक लागणार आहे. दरम्यान, कालव्यांची दुरुस्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. धोम पाटबंधारे खात्याने या दीर्घ कालावधीत साधी कालव्याच्या बाजूची व अंतर्गत साफसफाईसुध्दा केली नव्हती. कालव्यांच्या दयनीय अवस्थेबाबत प्रसार माध्यमांनी अनेक वेळा पाटबंधारे खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. पाटबंधारे खात्याने शासन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देत नसल्याचे कारण पुढे करत कालव्यांची कामे केलेली नव्हती. प्रसार माध्यमांच्या रेट्यामुळे व लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागणीमुळे अखेर धोम पाटबंधारे खात्याला जाग येवून धोम पासून पाचवडपर्यंत सुमारे सतरा किलोमीटर अंतर कालव्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे-झुडपे व अंतर्गत गाळ काढण्यात येवून काही ठिकाणची गळती काढीत दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणचे नवीन पूल आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहेत. पाटबंधारे कार्यालयाच्या बाजूलाच असणाऱ्या कालव्यावरील पुलाचे काम ग्रामस्थांच्या मागणीवरून करण्यात आले आहे. हे काम आमदार फंडातून करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने धोम ते पाचवड कालव्यावरील पूल नव्याने उभारावेत अशीही मागणी लाभार्थी शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
या कालव्याव्दारे हजारो शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनी ओलिताखाली आल्या आहेत, तसेच या पाण्यातून कररुपी पैसा पाटबंधारे खात्याने अनेक वर्षांपासून गोळा केला आहे. तरीही गेल्या कित्येक वर्षात संबंधित खात्याने कालव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
पाटबंधारे खात्याने कालव्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ज्या ठिकाणी जास्त पडझड झालेली आहे, अशा ठिकाणी सिमेंटचे बांधकाम करून कायम स्वरूपी गळती काढण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याने कालवे दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त शोधाला असल्याने लवकरच कालव्यावरील नादुरुस्त पूल दुरुस्त करावेत, अथवा नव्याने उभारावेत अशीही मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. कालवा नादुरुस्ती मुळे जे दरवर्षी लाखो लिटर पाणी वाया जाते तेही वाचण्यात मदत मिळेल.