नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी आपण वर्ष 2047 मध्ये साजरी करणार आहोत. सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. आता देशाप्रती आपली सर्वांची जबाबदारी मोठी असून सर्वच क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचे ध्येय ठेवणे आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त येथील लाल किल्ला या ऐतिहासिक स्थानावरुन ते देशवासियांशी संवाद साधत होते. सलग आठव्या वर्षी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणारे मोदी हे देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रिय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी, लष्कर, नौसेना आणि वायूदल प्रमुखांसह टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत अजूनही ऊर्जा क्षेत्राबाबत परावलंबी आहे. यामुळे देशाला स्वावलंबी व्हावं लागले. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देशाला ऊर्जा स्वावलंबी बनवण्याचा संकल्प करूया. यासाठी सरकारने योजना तयार केली आहे.
देशातील सैनिका शाळांमध्ये मुलींनाही शिक्षण दिले जाईल असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, नव्या सुधारणा लागू करण्यासाठी चांगेल आणि स्मार्ट गव्हर्नन्स पाहिजे. भारत गव्हर्नन्सचा नवा अध्याय लिहित आहे, याचे साक्षीदार आज संपूर्ण जग आहे.
आगामी काळात पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय योजनेनुसार 100 लाख कोटींहून अधिक योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ही अशी योजना आहे, ज्यामुळे समग्र पायाभूत सुविधेचा पाया रचेल. आता वाहतुकीच्या साधनांमध्ये ताळमेळ नाही. हा अडथळा यामुळे दूर होईल.
भारत आगामी काळात प्रधानमंत्री गतीशक्ती- नॅशनल मास्टर प्लॅन लॉंच करणार आहे. तसेच आता स्वदेशी वस्तूंच्या उत्पादन भारत मागे नाही. देशात सध्या तीन बिलियन डॉलर्सचे मोबाइल निर्यात करत आहे. स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतची समुद्रात चाचणी सुरू आहे. आज भारत आपले लढावू विमान विकसित करत आहे. पाणबुडी बनवत आहे एवढचं नव्हे तर गगनयान मोहीमही राबत आहे.
गावांमधील बचत गटांमध्ये आठ कोटींहून अधिक महिला आहेत. त्या एकत्र येऊन उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना देश आणि विदेशात बाजार उपलब्ध होईल यासाठी सरकार ई-कॉमर्स प्लॅफॉर्म तयार करणार आहे. छोटा किसान देश की शान बनेल… आपले स्वप्न आहे. आगामी काळात छोट्या शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना सुविधा दिल्या जातील. तसेच पीएम किसान योजनेनुसार जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांना दीड लाख कोटींची आर्थिक मदत दिली गेली आहे.
छोट्या शेतकऱ्यांवर आतापर्यंत लक्ष दिले गेले. आता या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड, सौर ऊर्जा पंप, शेतकरी उत्पादक संघटनांद्वारे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. आता वेअर हाऊस चळवळ राबवली जाईल. तसेच देशातील 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असणे ही चिंतेची बाब आहे, असे सांगत पंतप्रधानांनी सहकार चळवळीचे महत्त्वही अधोरेखित केले.
सहकारी चळवळ ही देशाच्या विकासासाठी मोठे क्षेत्र आहे. सहकार हे एक संस्कार आहे आणि एकत्रित चालण्याची मनोवृत्ती आहे. यामुळे सरकारने सहकार क्षेत्रासाठी वेगळे मंत्रालय बनवले आहे. राज्यांतील सहकारला आणखी बळकटी देण्यासाठी हे सहकार मंत्रालय स्थापन केले आहेः पीएम मोदी
आता जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे. सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटीमुळे लडाख उच्च शिक्षणाचे केंद्र बनणार आहे, याकडे लक्ष वेधून मोदी पुढे म्हणाले की, लवकरच ईशान्येतील सर्व राज्यांच्या राजधानी रेल्वे मार्गाद्वारे जोडल्या जातील. ईशान्य भारताच्या विकासाठी पर्यटन, ऍडव्हेंचर स्पोर्टसला चालना दिली जाईल.
देशातील ओबीसी समाजांना आरक्षणाचा अधिकार मिळणार आहे. मागास समाजांना आरक्षणाचा अधिकार देण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, गरीब महिला आणि मुलांमध्ये कुपोषणाने त्यांच्या विकासात मोठा अडथळा येतो. यामुळे गरीबांना पोषणयुक्त तांदळाचा पुरवठा केला जाईल.
सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायच्या आहेत. उज्ज्वला, आवास आणि आयुषमान भारत, या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचतील यासाठी काम करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेतः पीएम मोदी
करोनाच्या संकटात अनेक मुलं अनाथ झाली. त्यांनी आपल्या पालकांना गमवलं. हे अतिशय वेदनादायी आहे. पोलिओची लस मिळवण्यासाठी देशाला अनेक वर्षे लागली. पण करोना लसीसाठी आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची वेळ आली नाही. करोनाचे संकटाचा भारतीयांनी संयमाने आणि धैर्याने सामना केला आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी भारताला लस विकसित करून दिली. आज आपल्याला लसीसाठी कुणावर अवलंबून रहावं लागलं नाही, असेही मोदी शेवटी म्हणाले.
स्वामी विवेकानंदाच्या विचारांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की,
जहां तक हो सके अतीत की ओर देखो।
पीछे जो चिर नूतन झरना बह रहा है,
आकंठ उसका जल पीयो।
उसके बाद सामने की ओर देखो।
आगे बढ़ो और भारत को
पहले से ज्यादा उज्ज्वल, महान, श्रेष्ठ बनाओ.