कोलकाता: प्रख्यात रंगकर्मी उषा गांगुली यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. उषा गांगुली यांचे वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दक्षिण कोलकाता येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा असून काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 1945मध्ये त्यांचा जन्म झाला. उषा गांगुली यांनी लहानपणीच भरतनाट्य शिकण्यास सुरूवात करत आपल्यातील कौशल्य दाखवून दिले. पुढे कोलकाता येथे पदवीपर्यतचे शिक्षण पूर्ण करत हिंदी साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर बंगाली थिएटरचा बोलबाला असलेल्या कोलकात्यात त्यांनी हिंदी थिएटरची स्थापना केली.
उषा गांगुली यांनी अनेक नाटकात काम केले आहे. यात काशी का अस्सी, महाभोज, रुदाली, कोर्ट मार्शल आणि अंतरकथा अशा काही प्रसिद्ध नाटकांचा समावेश आहे. ही नाटक रायपूरसह देशभरात गाजली होती. काशीनाथ सिंह यांच्या कादंबरीवर आधारित त्यांचा बहुचर्चित नाटक “काशी का अस्सी’ने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. या नाटकाचे देशभरात सादरीकरण करण्यात आले आहे. “अंतरकथा’ हे एकपात्री नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. 1998मध्ये “गुडिया घर’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. .
रंगमंचाच्या माध्यमातून त्यांनी बांग्ला-हिंदीचं सेतुबंधन केले. त्यांचं “अंतयात्रा’ हे नाटक याचीच अनुभूती देते. या नाटकातून उषा गांगुली यांच्या प्रतिभेची प्रचिती येते. हे नाटक म्हणजे एकप्रकारे त्यांच आत्मचरित्रच आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि रंगजीवनात ज्या स्रिया आल्या त्या सर्व यात आहेत. उषा गांगुली अभिनीत आणि दिग्दर्शित अंतयात्रा हे केवळ नाटक नसून आतल्या आणि बाहेरील युद्धात झुंज देणा-या स्रीचा एक संघर्ष गाथा आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. तसेच दिग्दर्शक अपर्णा सेन, सोहाग सेन, दिग्दर्शक सुदेशना रॉय आणि नाटक आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.