नगर – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, गंज बाजार, घास गल्ली, नवी पेठ या ठिकाणचे पथारीवाले व हातगाडी धारकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्याच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी नगर व्यापारी महासंघाने आमरण उपोषण केले होते. मात्र कायमस्वरूपी कारवाई न झाल्याने महासंघाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनपा आयुक्त डॉ. जावळे यांची भेट घेत दिवाळीपूर्वी अतिक्रमणे न काढल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.
यावेळी आयुक्त पंकज जावळे यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या. येत्या 13 ऑक्टोबर पासून शहरातील अतिक्रमणे काढण्याचे नियोजन केले आहे, असे सांगण्यात आले. तसेच हा विषय टाऊन व्हेंडिंग कमिटी पुढे मांडणार आहे, असे स्पष्ट करत या कमिटीत नगर व्यापारी महासंघाच्या सदस्यांना घेण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा, नगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, उपाध्यक्ष अभिमन्यू जाधव, सचिव संदीप बायड, सहसचिव प्रतिक बोगावत, मनिष सोनग्रा, कुणाल भंडारी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी महासंघाचे सदस्य संतोष ठाकूर, प्रतिक बोगावत, प्रकाश बायड, भैय्या भांडेकर उपस्थित होते.