आपल्या बॅंक खात्यावर जमा असलेले पैसे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक, पासबुक या कशाचाही वापर न करता, बॅंकेमध्ये न जाता आपल्याला पोस्टातून किंवा पोस्टमनकडून मिळू शकतात, याची अनेकांना माहिती नसते. यासाठी आवश्यक असतो तो केवळ आधार क्रमांक आणि तुमच्या अंगठ्याचा ठसा !
टपाल खात्याने कात टाकली असून संगणकीकरण, इंटरनेट यांच्या माध्यमातून अद्ययावतीकरणाकडे आगेकूच केली आहे. पोस्ट पेमेंट बॅंकेमुळे टपाल खात्यांचे बॅंकीकरण झाले आहे. आज देशातील 1.36 लाख टपाल कार्यालयांमध्ये असणाऱ्या 1.86 लाख एईपीएस डिव्हाईसच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकांना बॅंक खात्यातून पैसे काढण्यासाठी पायपीट करण्याची गरज नाही. त्यांना पोस्टमनकडून खात्यातील पैसे काढता येऊ शकतात.
या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग झाला तो कोविड काळात. कारण त्यावेळी अर्थव्यवहार ठप्प असल्यामुळे आणि रोजगार, उद्योग बंद असल्यामुळे साठवून ठेवलेले पैसे काढण्याशिवाय अनेकांना गत्यंतर उरले नव्हते. पण यासाठी बॅंकेमध्ये जावे तर गर्दीच्या संपर्कात येऊन संसर्ग होण्याची भीती होती. अशा वेळी टपाल खात्याच्या या अभिनव उपक्रमाने अनेकांना दिलासा मिळाला. 2020 मध्ये 24 मार्च ते 23 एप्रिल या काळात देशभरातील काही राज्यांत या उपक्रमाच्या माध्यमातून टपाल खात्याने तब्बल 412 कोटी रुपयांचे वितरण केल्याची नोंद आहे. सुमारे 21 लाखांहून अधिक व्यवहार या काळात झाले. देशभरातील आकडा विचारात घेतल्यास तो 6000 कोटींहून अधिक आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बॅंक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असणे गरजेचे आहे. तसे असल्यास कोणत्याही बॅंक खात्यातील दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम पोस्टातून किंवा पोस्टमनकडून थंबिंग मशिनवर अंगठ्याचा ठसा देऊन काढू शकतो. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा लागेल. तेथे बॅंक खात्याची पोस्ट खात्यातील अधिकारी पोस्टमनला घरी पाठवतात.
पोस्टमनकडून आपला बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक त्याच्याकडील ऍपवर किंवा मायक्रो एटीएम डिव्हाईसवर नोंदवला जातो. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी ऍपवर नोंदवल्यानंतर आधार क्रमांकाची विचारणा होते.
हा क्रमांक नोंदवल्यानंतर या डिव्हाईसवर अंगठ्याचा ठसा घेऊन पडताळणी केली जाते. तसेच कोणत्या बॅंकेतून पैसे काढावयाचे आहेत त्या बॅंकेचे नाव नोंदवले जाते. या प्रक्रियेनंतर आपल्या बॅंक खात्याचा तपशील पोस्टमनच्या ऍपवर उपलब्ध होतो.
आपल्याला आवश्यक असणारी रक्कम नोंदवून अंगठ्याचा ठसा घेऊन आपल्याला दिली जाते. टपाल कार्यालयांनी यासाठी काही ठरावीक क्रमांक सार्वजनिक केले आहेत. पोस्टाची ही सेवा क्रांतिकारी आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, दिव्यांग, रुग्ण, चालण्या-फिरण्याची क्षमता नसणारे, गरीब, शेतकरी, मजूर यांसारख्यांना ही सेवा दिलासादायक आहे. चालते-फिरते एटीएम बनलेला पोस्टमन हा त्यांच्यासाठी दूतच ठरत आहे.