पिंपरी – महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. तो कोणाच्या अंगावर जात नाही. परंतु, कोणी अंगावर आल्यास त्यांना महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देतो. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास आहे. वारंवार आमच्या महापुरुषांचा अवमान करणारे राज्यपाल आम्हाला नकोत. त्यांना तातडीने हटवा, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नसून त्याची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. जे महाराजांना मानत नाहीत. त्यांचा इथे कडेलोट होतो, असे प्रतिपादन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बहुजन महापुरूष सन्मान कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि.8) पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन केले होते. या बंदमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी पिंपरी येथे उपस्थित राहून आंदोलकांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे इम्रान शेख, शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, मनसे शहरप्रमुख सचिन चिखले, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, काशिनाथ नखाते, मारूती भापकर, मानव कांबळे यांच्यासह विविध पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबाबत दोनवेळा वादग्रस्ते विधाने केली आहेत. तरी त्यांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. त्यांना एवढी कसली मग्रुरी आहे, हे कळत नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांसह भाजपावर घणाघाती टिका केली. तसेच, आता दिलगिरी व्यक्त केली, तरी आम्ही मान्य करणार नाही, असेही ते म्हणाले.