मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यत्र नाना पटोले वादाच्या गर्तेत अडकले आहेत. आता प्रदेश काँग्रेसकडून नाना पटोले हटाव मोहीम जोर धरू लागली आहे. नाना पटोले यांच्याऐवजी शिवाजीराव मोघेंना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थक करत आहेत. विदर्भातील अनेक नेते नाना पटोले यांना हटविण्यासाठी पुढे आलेले आहेत. नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली आहे. नाना पटोले यांच्यामुळेचे काँग्रेसची मुख्य व्होटबॅंक असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी यांना पक्षात दूर करण्यात आले आहे. नाना पटोले हे पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे.
नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कुणाचंही ऐकत नाही असा गंभीर आरोप विदर्भातील 24 नेत्यांनी केला आहे. त्यामुळे पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा आणि आदिवासी नेते शिवाजीराव मोघेंना प्रदेशध्यक्षपद करा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता रमेश चेन्निथला याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंह सलूजा, इक्राम हुसैन यासोबत इतर 21 पदाधिकाऱ्यांनी रमेश चेन्निथला यांची मुंबईत भेट घेतली. नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यासाठी हे सर्व नेते लवकरच हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जाणार आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्याने सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तर सत्यजीत तांबे यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसतानाही अपक्ष अर्ज भरुन एकप्रकारे बंड पुकारले होते. यावरुन नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच बाळासाहेब थोरात नाराज असल्याचीही चर्चा सुरु झाली होती.