विश्रांतवाडी -पुणे-नगर महामार्गावरील असलेल्या “बीआरटी’मुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यात उन्हामुळे आणखीच भर पडत आहे. अपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला बीआरटी मार्ग काढून टाकण्याबाबत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पठारे यांनी याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन दिले असून यावर तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे शहरात एकीकडे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, दुसरीकडे शहरात जलद बस वाहतूक योजेनेच्या (बीआरटी) रस्त्यांबाबत कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वडगावशेरी येथील बीआरटी मार्ग हटवून हा रस्ता सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी नगरिकांकडून जोर धरत आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, बीआरटीमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत असल्याने हा मार्ग पूर्णत: हटवावा. अन्यथा, आंदोलन केले जाईल. नागरिकांची होणारी गैरसोय कमी व्हावी, यासाठी मी गेली काही महिने सातत्याने महापालिकेला व वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. पण, त्यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने आंदोलना शिवाय पर्याय राहिलेला नाही.
शहराची वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची खोदकामे, आधीच रस्त्यांची झालेली दुरवस्था हे सर्व घटक वाहतुकीच्या समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. यावर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना आखणे व त्या अंमलात आणणे गरजेचे असताना याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार तीव्र आंदोलन करण्याची तयारी केली आहे, मतदार संघातून हजारो नागरिक यामध्ये सहभागी होतील, असेही पठारे यांनी सांगितले.
=