– श्रीनिवास वारुंजीकर
मुंबई – वयाची सर्व 88 वर्षेही एका एनर्जीयुक्त वातावरणात घालवलेल्या चिरतरुण देव आनंद यांचे दरवर्षी दि. 3 डिसेंबर रोजी स्मरण अवश्य केले जाते. दि. 3 डिसेंबर 2011 रोजी देव आनंद यांचे लंडनमध्ये वृद्धापकाळाने निधन् अ झाले होते. ते हयात असते तर आज शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजे 98 वयाचे असते. देव आनंद यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील “प्रभात’ स्टुडिओ’पासून झाली होती. कराचीहून पुण्यात आलेल्या देव आनंद यांचे अभिनेता बनण्याचे स्वप्न तर साकारलेच; शिवाय सिनेसृष्टीतील देशाचा सर्वोच्च मानाचा “दादासाहेब फाळके पुरस्कार’ही त्यांना मिळाला.
पल्लेदार संवाद एका श्वासात म्हणण्याच्या बाबतीत देव यांचा हात धरणे अशक्य होते. गळ्यात स्कार्फ, डोक्यावर एखादी हॅट, फेल्टहॅट, हातात काठी आणि एका विशिष्ट लकबीत हलणारे शरीर तसेच बारीक डोळे करुन बोलण्याची स्टाईल अशा सर्वच बाबतीत देव आनंद यांच्या स्टाईलचे अनुकरण करण्यात तेव्हाची पिढी धन्यता मानत असे.
वर्ष 1924 च्या सप्टेंबर महिन्यात 23 तारखेला धरमदेव पिशोरीमल आनंद अर्थात देव आनंदचा जन्म गुरुदासपूर जिल्ह्यातील शाकारगड पंजाब (आता पाकिस्तानात) येथे झाला. वर्ष 1946 मध्ये “प्रभात स्टुडिओजच्या “हम एक है…’ या चित्रपटाद्वारे देव आनंदच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत देव आनंदने एकामागोमाग एक हिट सिनेमे दिले.
वर्ष 1951 मध्ये “बाजी’, मग “टॅक्सी ड्रायव्हर’ (1954), “सी.आय.डी.’ (1956), “काला पानी’ (1958-फिल्मफेअर पुरस्कार), “हम दोनो’ (1961) तसेच वर्ष 1965 मध्ये आलेल्या “गाईड’ने उत्पन्नाचे विक्रम केले. हा सिनेमा, यातील गाणी तर गाजलीच; शिवाय त्यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यासाठी हा सिनेमा भारताचे प्रतिनिधित्त्व करत होता. मग “जॉनी मेरा नाम’ (1970), “तेरे मेरे सपने’ आणि “हरे रामा हरे कृष्णा’ (दोन्ही 1971) या सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतले. साठच्या दशकातील सुप्रसिद्ध त्रिकुट असलेल्या देव-राज-दिलीप मधले देव आनंद, राज कपूर आणि दिलीपकुमार यांचा ठसा सिनेरसिकांच्या मनातून कधीच पुसला जाणार नाही. या महान अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली.