कर्जत – रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्जतला रचनात्मक व गुणात्मकदृष्ट्या प्रगती होत आहे. या बदलाच्या मुळाशी दलितमित्र दादा पाटील यांचा त्याग आणि संघर्षमय जीवन आहे, त्याचे सर्वांनी स्मरण करावे, असे प्रतिपादन युवक नेते रोहित पवार यांनी केले.
रयत संकुलाच्या वतीने आयोजित दलितमित्र दादा पाटील यांच्या 28 व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, सुनंदाताई पवार, बाप्पाजी धांडे, बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले पाटील, दादासाहेब सोनमाळी, तात्यासाहेब ढेरे, डॉ. सचिन पाटील, प्रा. किरण पाटील, सतीश पाटील, निर्मला पाटील, सुरेश खिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
फाळके यांनी दादा पाटील यांचे शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात अतुलनीय असल्याचा उल्लेख करीत कर्मवीर अण्णांच्या कार्यानंतर दादा पाटलांच्या कार्याचा विचार करावा लागतो, अशी भावना व्यक्त केली. प्रा. किरण पाटील, प्रा. रजनी पाटील यांनी दादा पाटलांच्या आठवणी सांगितल्या. बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुधाकर खेतमाळस यांनी आभार मानले. प्रा. डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. डॉ. भारती काळे, प्रा. रामकृष्ण काळे यांनी सूत्रसंचालन केले.