आरोग्याधिकारी विधाते यांच्याकडे केली मागणी
कोपरगाव – शहरातील नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी साचून या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक डेंग्यूसदृश आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने योग्यती उपाययोजना करावी, अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव शहर तसेच तालुक्यातील बोलकी, धोत्रे, सोनारी आदी गावांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी या रुग्णांची संख्या वाढली आहे. कमी झालेले पर्जन्यमान व वातावरणाच्या झालेल्या बदलाचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
आरोग्य विभागाणे शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी नागरिकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करावे. ज्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी फवारणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन काळे यांनी केले आहे.