दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती
नवी दिल्ली – दिल्ली राज्यात दुर्दैवाने करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर जी उपाययोजना करणे अपेक्षित आहे ती आम्ही आधीच दक्षतेचा उपाय म्हणून सज्ज ठेवली आहे, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की डॉ, एस. के. सरीन यांच्या नेतृत्वाखालील पाच डॉक्टरांच्या पथकाने आम्हाला स्टॅंडर्ड ऑपरेटिंग पद्धतीचा एक अहवाल सादर केला आहे. त्यात रोज 100, 500 किंवा 1000 हजार नवे रुग्ण दाखल झाले तर त्यावर काय उपाय योजले पाहिजेत आणि त्यासाठीची वैद्यकीय व्यवस्था कशी असली पाहिजे याचा तपशील आहे. त्यानुसार आम्ही आमची यंत्रणा सज्ज ठेवली आहे असे ते म्हणाले.
आज वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितले की, वैद्यकीय सुविधेतील त्रुटी आम्ही दूर करीत आणल्या असून आता आम्ही दररोज करोनाचे एक हजार रुग्ण जरी दाखल झाले तरी त्या आव्हानाशी मुकाबला करण्याची सज्जता ठेवली आहे. तथापि, दिल्लीतील करोनाचे रुग्ण आता कमी होत आले असून पुढील काळातही ते कमीच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण अचानक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलीच तर त्याला सामारे जाण्यासाठी दिल्ली सरकारची यंत्रणा सज्ज आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
दिल्लीत रोज सुमारे दोन लाख लोकांना मोफत अन्न दिले जात असून ही क्षमताही आम्ही आता वाढवत असून रोज चार लाख लोकांना जेवणाची सोय करण्यात येणार आहे. दिल्लीतील 224 नाईट शेल्टर्स आणि 325 शाळांमधून ही सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत राहणाऱ्या बाहेरील राज्यांच्या नागरिकांचीही काळजी आम्ही घेत आहोत, तशी विनंती संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारकडे केली आहे, असेही केजरीवालांनी सांगितले.