नवी दिल्ली: भाजप समर्थक सामान्यत: त्यांच्या विचारसरणीबद्दल स्पष्ट आणि कट्टर दृष्टिकोन बाळगतात. प्रत्येक पावलावर ते पक्षासोबत उभे असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षात पक्ष आणि समर्थक-कार्यकर्ते यांच्यातील युती अधिक मजबूत झाली आहे. मात्र जेव्हापासून भाजपने आपल्या दोन प्रवक्त्यांवर कारवाई केली आहे, तेव्हापासून त्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. अरब देशांच्या दबावाखाली नुपूर शर्माला शिक्षा झाल्याचा संदेश पक्षात खालपासून वरपर्यंत गेला आहे. याची किंमत भाजपला मोजावी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांची नाराजी भाजपला नुकसान करणारी ठरू शकते, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. मात्र, भाजप नेत्यांना असं वाटत नाही. पक्षाच्या एका नेत्याने म्हटलं की, सोशल मीडियावरील अस्वस्थता क्षणिक आहे. पक्षाने ठरवलेल्या सुशासनाच्या अजेंडावर भाजप चालत राहाणार असून द्वेष निर्माण करणाऱ्या स्थान नाही.
नुपूर शर्मा यांनी एका पोस्टमध्ये आपली बाजू मांडली होती. त्यानंतर, भाजप समर्थक नुपूर शर्माच्या समर्थनार्थ उभे राहिलेले दिसत आहेत. ‘गेल्या अनेक दिवसांपासून मी टीव्हीवर चर्चेत होते, जिथे माझ्या आराध्य शिवाचा दररोज अपमान केला जात होता. हे शिवलिंग नसून कारंजे आहे, असे माझ्यासमोर बोलले जात होते. दिल्लीच्या प्रत्येक फूटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात, असे चर्चेदरम्यान वारंवार बोलले जात होते. जा आणि पूजा करा, असं म्हटलं जात होतं, अशा आशयाची पोस्ट नुपूर यांनी शेअर केली होती.
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या व्यासपीठावरून आपले वादग्रस्त वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार कोणालाही नाही. पक्षावर टीका होत असताना, एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “पक्षाने अल्पसंख्याक तुष्टीकरणाला सातत्याने विरोध केला आहे आणि पुढेही करत राहील. परंतु दुसरीकडे आपण अपमानास्पद टिप्पणी करू नये.
एका मंत्र्यांनी म्हटलं की, नुपूर शर्मांवरील कारवाईने लोक रागावले असतील. त्यांची हिंदुत्वाप्रती असलेली बांधिलकी आणि पाठिंबा आम्हाला महत्त्वाचा वाटतो. पण सार्वजनिक जीवनात तुम्हाला संयम ठेवावा लागतो. जेव्हा तुम्ही पक्षात प्रवेश करता आणि तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाते, तेव्हा तुम्ही पक्षाच्या भूमिकेचे पालन करणे अपेक्षित असते.
दरम्यान नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांच्यावरील भाजपच्या कारवाईमुळे पक्षात असंतोष वाढण्याची शक्यता आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला कार्यकर्त्यांनी नाराजी धोक्याची ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.