नागपूर – करोनाच्या संकट काळात राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे.
दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारतातील लाखो खाण कामगारांसाठी त्यांच्या आरोग्याशी निगडीत महत्वाचे संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेने नागपुरातील त्यांचे कार्यालय आणि प्रयोगशाळा गुंडाळत अहमदाबादची वाट धरली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तसेच शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विस्तारलेले खाणकाम उद्योग आणि त्याच्याशी संबंधी लाखो मजुरांच्या आरोग्यासाठी मोलाचे संशोधन करण्यासाठी 2002 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात असणे आवश्यक असल्याचे ओळखले होते.
तेव्हा कर्नाटकातील कोलारमधून राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात स्थलांतरित केली गेली होती. तेव्हा खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर संशोधन करून त्याबद्दल उपाय शोधण्यासाठी नागपुरात एक अद्ययावत प्रयोगशाळा ही उभारली गेली होती. तेव्हा पासून राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि त्याची अद्ययावत प्रयोगशाळा खाणीत काम करणारे मजूर आणि खाणीच्या अवतीभवती राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या जीवनाला सुसह्य बनवण्यासाठी महत्वपूर्ण कामे करत होती.
मात्र, 2019 मध्ये अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरविले. त्यांसदर्भात जुलै 2019 मध्येच केंद्रीय कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आले होते.