गोवाहटी/ पाटणा – पूरग्रस्त आसाम आणि बिहारमध्ये मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. आसाममध्ये परिस्थिती सुधारली असली तरी राज्यात 26 लाख लोक अद्याप पूराच्या प्रभावाखाली आहेत. आज 3 जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा 100 वर पोहोचला. तर 48 हजार लोक मदत शिबिरात राहत असून त्यांना मदत साहित्य वाटप केले जात आहे. धुबरी, बारपेटा, मोरीगाव, गोलपारा हे सर्वाधिक पूरग्रस्त जिल्हे आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मदत व बचाव कार्य करीत आहेत. दरम्यान, परिस्थिती सुधारल्यानंतर मदत उपायांची पारदर्शकता तपासण्यासाठी सोशल ऑडिट केले जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
बिहारमध्ये राज्यातील पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती कायम आहे. दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज, सीतामढी, सुपौल आणि पश्चिम चंपारण हे सर्वाधिक पूरग्रस्त जिल्हे आहेत. दहा जिल्ह्यातले सुमारे 11 लाख लोक पुराच्या प्रभावाखाली सापडले आहेत. मदतकार्य बचावकार्य जोरात सुरू आहे.
भारतीय वायुसेनेची तीन हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात मदतकार्य करीत आहेत. आवश्यक वस्तूंसह वीस हजाराहून अधिक ड्राईफूड पॅकेट्स पूरग्रस्त भागातल्या लोकांमध्ये टाकली गेली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 22 पथके मदतकार्यासाठी दाखल करण्यात आली आहेत. सुमारे एक लाख बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे आणि 15 हजार लोकांनी 28 मदत शिबिरात आश्रय घेतला आहे. पूरासंबंधीच्या घटनांमध्ये 34 लोकांचा जीव गेला.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पर्यायी मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. बागमती, बुही गंडक आणि कमला बालनसह प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगा, पुनपुन आणि घागरा यांची पातळीही वाढते आहे. येत्या 24 तासांत नेपाळ आणि बिहारच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.