पुणे – ज्या कंपन्यांमध्ये शंभरपेक्षा कमी कर्मचारी असून, त्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे, अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात केंद्र सरकार 24 टक्के पीएफची रक्कम भरणार आहे. या योजनेचा पुणे विभागातील 5,400 आणि आकुर्डी विभागातील 4,700 अशा एकूण 10 हजार 100 कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
करोनाचे सावट देशभर पसरले आहे. अशा परिस्थितीत कमीत कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि ते काम करीत असलेल्या कंपन्यांचेही आर्थिक नुकसान होऊ नये. याकरिता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या पगारावरचीच रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
एखाद्या कंपनीत शंभरपेक्षा कमी कर्मचारी आहेत. त्यापैकी 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजारपेक्षा कमी आहे. त्यांच्या पगाराच्या 12 टक्के पीएफची रक्कम आणि कंपनीतर्फे भरण्यात येणारी 12 टक्के पीएफची रक्कम अशी एकूण 24 टक्के पीएफची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वेबसाईटवर यांसंबंधिची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना पीएफचे चलन भरणे अनिवार्य आहे. पीएफच्या “ईपीएफओ डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाइटवर यासंबंधिची माहिती दिली आहे, असे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे (पुणे विभाग) आयुक्त अतूल कोतकर यांनी दिली.