“आधार’वरील पत्त्याशिवाय इतर पत्ताही राहणार ग्राह्य
प्रतिज्ञापत्राच्या आधारावर दिलेला पत्ता गृहीत धरला जाणार
पुणे – आधार कार्डवर नागरिकाचा मूळ पत्ता असतो. मात्र, नंतर कामानिमित्त अनेकजण स्थलांतर करतात. स्थलांतराच्या ठिकाणी बॅंक खाते उघडण्यासाठी किंवा इतर कामासाठी पत्त्याची आवश्यकता असते. मात्र, आधार क्रमांकावर मूळ पत्ता लिहिलेला असतो, त्यामुळे स्थलांतरित कामगारांची कुचंबणा होत होती. यातून आता सरकारने मार्ग काढला असून स्थलांतरित ठिकाणी तेथील पत्ता प्रतिज्ञापत्राच्या आधारावर दिला तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे.
लोकांचे जगणे सुसह्य व्हावे आणि उद्योग करणे सोपे व्हावे या दृष्टिकोनाचा भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तिची ओळख बायोमेट्रिकवर आधारच्या माध्यमातून केली जाऊ शकते. मात्र, आधार क्रमांकावरील पत्ता आणि सध्याचा पत्ता यामध्ये बदल असू शकतो. त्याकरिता संबंधित नागरिकाने प्रतिज्ञापत्रावर नवा पत्ता दिला तरी तो त्याच व्यक्तीचा सध्याचा पत्ता आहे, असे गृहीत धरला जाणार आहे. बॅंका आणि इतर ठिकाणी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताना संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड गरजेचे असते. कारण ही व्यक्ती तीच आहे हे बायोमेट्रिक माहितीच्या आधारावर सिद्ध होते. मात्र, स्थलांतरिताच्या सध्याचा पत्ता आणि आधार कार्डावरील पत्त्यामध्ये तफावत आढळल्यानंतर अनेकजण केवायसीला हरकत घेत होते. आता अशी हरकत घेण्याचे कारण उरलेले नाही. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे.
टेलिग्राफ आणि पीएमएलए कायद्यांमध्ये बदल
आधार कार्डवरील पत्त्याऐवजी इतर पत्ता प्रतिज्ञापत्राच्या आधारावर दिल्यानंतर तो ग्राह्य धरण्याचा नियम सरकारला दोन कायद्यामध्ये बदल करता आल्यामुळे शक्य झाला आहे. यासाठी टेलीग्राफ कायदा आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग कायद्यात आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना बदललेल्या पत्त्यामुळे त्रास होणार नाही.