नवी दिल्ली – घरासाठी कर्ज घेणाऱ्यांना मर्यादित काळासाठी भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. स्टेट बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार घरासाठी कर्ज घेणाऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत प्रक्रिया शुल्क लागणार नाही.
सध्या घरासाठी कर्ज घेणाऱ्यांना 0.40 टक्के इतके प्रक्रिया शुल्क द्यावे लागते.
स्टेट बॅंकेने म्हटले आहे की मर्यादित काळासाठी ही योजना मान्सून धमाका योजना म्हणून जाहीर करण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे. त्याच बरोबर विकसकांनी तयार केलेली घरे पडून आहेत.
अशा परिस्थितीमध्ये रिऍल्टी क्षेत्राला चालना मिळावी या दृष्टिकोनातून स्टेट बॅंकेने हा पुढाकार घेतला आहे. सध्या घरासाठीच्या कर्जाचे व्याजदर फार कमी आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती घरासाठी कर्ज घेणाऱ्यासाठी सोयीची समजली जात आहे. स्टेट बॅंकेने म्हटले आहे की स्टेट बॅंकेतर्फे दिल्या जाणाऱ्या घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यापासून सुरु होतो. त्यामुळे सध्याची परिस्थिती घरासाठी कर्ज घेणाऱ्यांना सर्वात योग्य आहे.
त्याचबरोबर शक्य तितक्या कमी वेळात ग्राहकांनी या योजनेचा फायदा घ्यावा याकरिता ही योजना फक्त 31 ऑगस्ट 2021 पर्यंत चालू राहणार असल्याचे स्टेट बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. अगोदरच व्याजदर कमी असताना प्रक्रिया शुल्कही माफ करण्यात आल्यामुळे ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेणे सोपे जाणार आहे असे स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी एस शेट्टी यांनी म्हटले आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच घर घेणाऱ्यांना आणि घरे तयार करणाऱ्यांनाही लाभ होणार आहे. बॅंकेने असे स्पष्ट केले आहे की बॅंकेच्या योनो ऍपवरून घरासाठी कर्ज घेतले तर 0.05 टक्के आणखी सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला घरासाठी कर्ज घेतील त्यांनाही व्याजदरात 0.05 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
स्टेट बॅंकेने बॅंकेने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर इतरही बॅंका आणि गृहवित्त संस्था अशा प्रकारच्या सवलती मर्यादित काळासाठी ग्राहकांना देण्याची शक्यता वाढली आहे. आगामी काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव येतात. या उत्सवाच्या काळामध्ये ग्राहक घरासारख्या मोठ्या खरेदीच्या योजनावर गंभीरपणे विचार करीत असतात. त्यामुळे बॅंका अशा प्रकारच्या सवलती या काळात जाहीर करीत असतात. गेल्या वर्षापासून भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर तसेच नव्या योजनावरही परिणाम झाला आहे. आगामी काळात परिस्थिती वेगाने पूर्वपदावर यावी याकरिता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकही प्रयत्नशील आहे.