सोशल डिस्टन्स पाळून खरीप हंगाम पीक कर्ज वाटप
केंदूर- करोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले जात आहे. दरम्यान, या परिस्थितीत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज देखील मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षांपेक्षा यावर्षी उसाच्या उत्पन्नाचे प्रमाण घटल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी चिंतित होता. मात्र, महा विकास आघाडी सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी केल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात नियमित कर्जदारांना कर्ज मिळणार की नाही, याची भीती होती. मात्र, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून पीक कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुखावले आहेत.
दरम्यान, पीक कर्ज वाटप करताना सोसायटी, बॅंक कर्मचारी योग्य ती काळजी घेत आहेत. सोशल डिस्टन्स पाळून पीक कर्जाचे वाटप होत आहे. त्यामुळे सोसायटी आणि बॅंक कर्मचारी शेतकऱ्यांना कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. दरम्यान केंदूर, करंदी, पाबळ येथील गावांत जवळपास पाचशे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे.
- पीक कर्ज वाटप करताना गर्दी होणार नाही, याची योग्य ती काळजी आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर शक्यतो शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे संपर्क साधून गरज असेल तेव्हाच कार्यालयात येण्याची विनंती करीत आहोत.
– प्रल्हाद खैरे, विकास अधिकारी, केंदूर.