पुणे – खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची दडी कायम असून शेतकऱ्यांमध्ये कमालीची चिंता आहे. त्याचवेळी खडकवासला आणि नीरा या दोन्ही प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. या प्रकल्पांतील जवळपास सगळीच धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरली असल्याने या लाभक्षेत्रामधील बंधारे आणि पाझर तलावांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले आहे.
पाऊस सुरू होऊन दोन महिने झाले तरी दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या जिरायती भागात अद्याप पाऊस नाही. जनावरांना चारा नसल्याने चारा छावण्या सुद्धा अजूनही सुरूच आहेत. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याची ही अवस्था असतानाच या दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्षही तसेच आहे. अजूनही अनेक गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. शेतीच्या पाण्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. कित्येक शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या तरी त्यांना पाणी मिळेना. उभी पिके जळून चालली आहेत. अशा परिस्थिती या भागातील शेते वाचविण्यासाठी तातडीने पाण्याची व्यवस्था करणे भाग आहे. या भागातील शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागलेले असतानाच खडकवासला आणि नीरा प्रकल्पातील वीर धरणाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे.