नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्यावेळी चीनने दहा भारतीय जवानांना ताब्यात घेतले होते. त्यात मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तथापि, त्याविषयी सतत तीन दिवस झालेल्या चर्चेनंतर आज या जवान व अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यात दोन मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. हे सर्व जण आता भारतीय हद्दीत परत आले आहेत.
एका इंग्रजी दूरचित्रवाणी वाहिनीने या जवान व अधिकाऱ्यांना चिनी सैनिक ताब्यात घेऊन जात असतानाची बातमी आम्हाला मिळाली होती, पण त्यांच्या सुटकेत बाधा नको म्हणून आम्ही ती प्रसारीत केली नव्हती असे म्हटले आहे. या सैनिकांना चीनने ताब्यात घेतल्याबद्दलची माहिती सरकार अथवा लष्कराकडूनही देण्यात आली नव्हती. उलट एकाही सैनिकाचे अपहरण झालेले नाही सर्व सैनिक जागेवर आहेत असा दावा गुरूवारी लष्कराकडून करण्यात आला होता. पण या सैनिकांच्या सुटकेसाठी सतत चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश आले आहे. दरम्यान याच वृत्तवाहिनीने चीन बरोबरच्या संघर्षात तब्बल 75 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे वृत्त देण्यात आले आहे. या सैनिकांच्या जखमा फार गंभीर स्वरूपाच्या नाहीत त्यांच्यावरील उपचारानंतर येत्या पंधरा दिवसांत ते पुन्हा आपल्या ड्युटीवर रूजू होतील असेही सांगण्यात येत आहे.