बजरंग दल, पोलिसांची मंचर, नारायणगावला कारवाई
मंचर (प्रतिनिधी) – विश्व हिंदू बजरंग दल आंबेगाव आणि समस्त हिंदू आघाडी यांनी पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या गोरक्षणाच्या कारवाईत मंचर, आळेफाटा आणि नारायणगाव येथे पंधरा गायींची सुटका आणि सुमारे 2 हजार दोनशे किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे.
शुक्रवारी (दि. 17) पहाटे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगमनेर येथून एक टेम्पो बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती तसेच पुण्याकडुन संगमनेरच्या दिशेने एक आयशर आणि एक पिकअप टेम्पो कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना समजली. त्यानुसार त्यांनी बजरंग दल आंबेगाव तालुका गोरक्षक आणि आळेफाटा पोलिसांच्या सोबत आळेफाटा येथे पहाटे आयशर टेम्पो क्रमांक (एमएच 14 एचक्यु 9563) आणि पिकअप टेम्पो क्रमांक (एमएच 14 एटी 0794) या वाहनचालकांकडे चौकशी केली असता संगमनेर येथे 13 गायी दाटीवाटीने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी संबधितावर गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्नर येथे कत्तल केलेले गोमांस टेम्पो क्रमांक (एमएच 42 बी 544) या वाहनातून सुमारे 2 हजार 200 किलो गोमांस पुण्याकडे घेऊन जात असताना नारायणगाव पोलिसांच्या मदतीने जप्त करुन संबधितांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मंचर येथे बजरंग दलाच्या गोरक्षकांनी कारवाई करत 2 गाई वाचवल्या. अशा एकुण 15 गायी भोसरी-पांजरपोळ येथे सुखरुप जमा करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये आळेफाटा, नारायणगाव, मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, हिंदू आघाडीचे मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, मंचरचे माजी उपसरपंच महेश थोरात, गोरक्षक सचिन पठारे, कौस्तुभ सोमवंशी, अक्षय जगदाळे, अतुल थोरात, मंगेश नढे, सुरज धरम, हर्षद पारखे, सुमित शिनगारे यांच्यासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.