नवी दिल्ली -सर्वांधिक करोनाबाधितांच्या संख्येतील जागतिक क्रमवारीत भारत टॉप टेन देशांमध्ये पोहोचला आहे. त्यापार्श्वभूमीवर, करोनाबाधित संख्या वाढीबाबत देशाला वाहतूक निर्बंधांमधील शिथिलता आणि स्थलांतरितांचा प्रवास महागात पडल्याचे तज्ज्ञांना वाटत आहे. चाचण्यांच्या क्षमतेमधील वाढही त्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
सध्या करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमधून बाधित संख्येच्या वाढीची नोंद होत आहे. मात्र, प्रवाशांचे प्रमाण वाढल्याने सध्या करोना फैलावाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणांवरही बाधित संख्येतील वाढ दिसू शकते. लक्षणे आढळत नसलेले त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी स्थलांतरित पोहोचलेल्या ठिकाणांवरील देखरेख वाढवावी लागेल, अशी भूमिका एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी मांडली.
लोक रस्त्यांवर उतरल्याच्या काळात योग्य सोशल डिस्टन्सिंग आणि हातांची स्वच्छता यांसारखी खबरदारी घेतली गेली नाही; तर करोनाचा फैलाव वेगाने होईल, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अधिक करोनाबाधितांची नोंद होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ चंद्रकांत एस.पांडव यांनी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून स्थलांतरितांची घरवापसी सुरू झाल्याच्या घडामोडीची तुलना धरणाचे दरवाजे उघडण्याच्या प्रक्रियेशी केली. ती घडामोड वणव्यासारखा करोना फैलाव होण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणारी असल्याचे त्यांनी म्हटले. पुढील काही दिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
योग्य सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाविना स्थलांतर होत राहिल्यास करोनाबाधितांच्या संख्येत भर पडत राहील. पुढील दहा दिवसांत देशातील करोनाबाधितांची संख्या 2 लाखांचा टप्पा ओलांडेल, असे परखड मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ के. के. आगरवाल यांनी नोंदवले.