जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज दिवसभर राहणार सुरू
मंगळवारपासून सकाळी
8 ते 12 दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
पिंपरी (प्रतिनिधी) – मंगळवार (दि.14) पासून शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यापासून शिथिलता आणली जाणार आहे. उद्या (रविवार) शहरातील अत्यावश्यक सेवा पुरविणारी सर्व दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर सोमवारपासून पुढील चार दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज जारी केले आहेत.
पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये गेल्या महिनाभरापासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार दि. 13 जुलै रोजी मध्यरात्रीपासून गुरुवार दि. 23 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आयुक्तांनी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये शहरात पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश आयुक्तांने दिले होते. पहिले पाच दिवस शनिवारी पूर्ण झाल्याने पुढील पाच दिवसांसाठीची नियमावली आयुक्तांनी आज जाहीर करत लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता दिली आहे.
रविवार (दि. 19) पासून शहरातील जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरु होणार आहेत. लॉकडाऊन शिथिलतेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 13 ते 18 जुलै दरम्यान लॉकडाऊनमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने बंद होती. त्यामुळे पहिल्या दिवशी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त वेळ दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोमवार (दि. 20) पासून दुकानांचा वेळ पुन्हा कमी करण्यात आली आहे. सोमवारपासून किराणा मालाची दुकाने, मंडई, भाजीविक्रेते, आठवडे बाजार, फेरीवाले, मटन, चिकण, अंडीविक्री करणारी दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर पुढील पाच दिवस हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, महाविद्यालये, जीम, मंदिरे बंदच राहणार आहेत. धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने, राजकीय कार्यक्रम घेण्यास पुढील आदेशापर्यंत बंदीच राहणार आहेत.
उपमहापौरांच्या मागणीची दखल
पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर शहरातील दुकानांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वीही दोन दिवस नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करताना कमी वेळ ठेवल्यास पुन्हा गर्दी होऊन संक्रमण वाढू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन उपमहापौर तुषार हिंगे यांनी रविवारी जास्त वेळ दुकाने सुरू ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. या मागणीची दखल घेत रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त अत्यावश्क सेवेची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.