सुरुचीच्या लेकाची म्हणजे ध्रुवची मुंज करायचे ठरले आणि सासरी आणि माहेरी दोन्ही घरी एकच धांदल उडाली. आधीच मागील वर्षात आलेल्या महामारीने सगळे घरात राहून कंटाळून गेले होते. आता थोडी सुटका झाल्यावर, फेब्रुवारीतला लगेचचा मुहूर्त काढला. सुरुची आणि तन्मय ही सर्वांची आवडती जोडी होती.
एकाच वर्गातील, मेरीट लिस्टमध्ये चमकलेले, अतिशय हुशार, उच्च विद्याविभूषित, त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम करणारे पण तरीही अतिशय साधे, जमिनीवर असलेले जोडपे, घरातील मोठ्यांचा आदर करणारे, त्यामुळे अर्थातच सर्वांचे लाडके.
आता मुंजीसाठी खरेदी सुरू झाली. पैठण्या, सोनाराच्या पेट्यांनी कपाटे भरू लागली. ध्रुवसाठी छान कपडे घेतले. बरोबर केळवणेही सुरू झाली. आनंद सुरू होता. मातृभोजनासाठी पाठशाळेतील लहान मुलांना बोलवायचे ठरले. ती एकटीच राहणारी मुले पाहून, अदिती थोडी अस्वस्थ झाली. सध्या सगळीकडे जरा अवघड परिस्थिती होती. यात एवढा खर्च करताना आपण समाजाची बांधिलकी जपली पाहिजे, असा विचार तिच्या मनात आला. सर्वांच्या संमतीने एक विचार समोर आला.
आईशी बोलणे झाले आणि ध्रुवबरोबर एका साधारण घरातील मुलाची पण मुंज, जी आर्थिक कारणास्तव राहिली आहे ती लावायची. सर्वांना कल्पना पसंत पडली आणि मग सुरू झाला शोध. सोशल मीडियामुळे हल्ली काही गोष्टी पटकन घडतात. अगदी कुठेही न जाता घरात बसून योग्य ती माहिती मिळते. बऱ्याच ग्रुपवर ही कल्पना पाठवली गेली आणि खरचं उदंड प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी तर आपणहून मदत करायची देखील तयारी दाखवली.
आलेल्या माहितीवरून पाटणकर नावाचे एक कुटुंब निवडले. त्यांच्या रोहनची मुंज मागच्या वर्षी ठरली होती. पण करोनामुळे होऊ शकली नव्हती. त्यात पुढे पाटणकरांची कंपनीच बंद पडली. सध्या हे कुटुंब खूप अडचणीत होते. मुंजीचा विचार तर त्यांनी मनातून काढून टाकला होता. आधीच साधारण असलेल्या परिस्थितीत अनंत अडचणी समोर आल्या होत्या. पाटणकर कुटुंब सुरुचीच्या घरी आले.
कोणतीही उपकाराची भावना न ठेवता, केवळ चांगल्या उद्देशाने हे करणार असल्याचे कळल्यावर पाटणकर कुटुंबही आनंदी झाले. ध्रुव आणि रोहनची पहिल्याच भेटीत मैत्री झाली आणि पाटणकरांकडेही मुंजीची गडबड सुरू झाली. सुरुचीने त्यांच्या घरातील सर्वांना नवीन कपडे घेतले. आईला छान साडी घेतली. मुंजीच्या दिवशी जवळच्या 10-12 नातेवाईकांना घेऊन, लवकर या, असा आग्रहही केला.
मुंजीचा दिवस उजाडला. हॉलवर मंडळी जमली. 7 वाजता विधी सुरू झाले. इकडे पाटावर ध्रुव आणि त्याचे आईबाबा आणि पलीकडे रोहनचे आईबाबा. मातृभोजनाचाही थाट झाला. दोघांचीही मुंज एका मुहुर्तावर लागली. सगळ्यांची जेवणे झाली. पाटणकर कुटुंब पण आनंदात होते. त्यांना सर्वांनी छान सामावून घेतले. इतर नातेवाइकांनीही रोहनला आहेर दिला. त्यांना संकोच वाटत होता, पण लोकांनी प्रेमाने सर्व केले.
दुसऱ्या दिवशी पाटणकरांनी घरात सत्यनारायणाची पूजा करून सुरुची आणि तन्मयच्या कुटुंबातील लोकांना आग्रहाने बोलावले. त्यांचे मनापासून आभार मानले. रोहनला मिळालेल्या आहेरातून त्याला एक सायकल घेतली, जीची तो खूप दिवस वाट पाहात होता. काही पैसे त्याच्या शिक्षणासाठ गुंतवले.
दोन्ही कुटुंबे जणू नात्याने जोडली गेली. पूर्वी घरातील सख्ख्या चुलत भावंडांची मुंज एकत्र करत. आजच्या आधुनिक काळात दोन वेगळी मुले व्रतबंधाच्या निमित्ताने नातेसंबंधात जुळली गेली. सुखी राहा, असा आशीर्वाद नकळतच सर्वांच्या मुखातून बाहेर पडला.
वरील सर्व घटना खरीच घडली आहे. फक्त नावे बदलली आहेत. हेतू इतकाच की अजून असे सुरुची आणि तन्मयसारखे तरुण तयार व्हावेत. या महामारीच्या काळात अनेक लोकांनी एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. कुणी औषधोपचारासाठी मदत केली, कुणी डबे पोहोचवले, कुणी रिक्षातून नेण्याची व्यवस्था केली. भाजी, सामान दिले, कितीतरी गोष्टी आहेत. आपण निदान खारीचा तरी वाटा उचलावा. शेवटी माणसाने संकटकाळी एकमेकांना मदत करणेच महत्त्वाचे.
-आरती मोने