नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या खून खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा ऍड. उमेशचंद्र यादव यांचीच नियुक्ती करावी, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे याने केली आहे.
या संदर्भात जरे यांच्या मुलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्तांना निवेदन पाठविले आहे. जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनीही या संदर्भातील मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.
या हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी, अशीही मागणी जरे यांच्यावतीने ऍड. पटेकर यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे. गेल्या 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. त्यात दुसऱ्या दिवशीच या हत्याकांडात बाळ बोठेच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो पसार होण्यात यशस्वी झाला. त्याचा अजूनही शोध लागत नसल्याने यामध्ये संशयाला पुरेसा वाव असल्याची शंका जरे यांच्यावतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, बाळ बोठे याच्या अटकेसंदर्भातील स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश देशभरातील अनेक पोलीस ठाण्यांत पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेखा जरे पाटील यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. तेव्हापासून पसार झालेल्या बोठे याचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहे.