– रवींद्र देशमुख
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014 ते 2019 या कालावधीत भारतीय जतना पक्षाला राज्यात जबरदस्त वलय मिळालं होतं. त्यामुळे भाजप एकट्यानेच बहुमताचा आकडा पार करेल, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. त्यामुळे भाजप नेतृत्व संपूर्ण आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरं गेलं. मात्र या आत्मविश्वासात भाजपने जुन्या चेहऱ्यांना डावललं होतं. आता डावललेल्या नेत्यांच्या पुनर्वसनाकडे भाजपने मोर्चा वळविल्याचं दिसत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना तिकीट नाकारलं होतं. त्याचवेळी पक्षांतर करून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांसाठी पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसमधून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना तर अखेरच्या टप्प्यात मंत्रीपदही दिलं होतं.
यापैकी चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने भाजपचं नुकसानच झालं. विदर्भात भाजपच्या जागा कमी होण्यामध्ये बावनकुळेंना नाकारण्याचं कारणही जोडलं जातं. बावनकुळे ज्या कम्युनिटीतून येतात, त्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती. त्याचा फटका निवडणुकीत बसला असा एक मतप्रवाह आहे. आता बावनकुळे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बावनकुळे देवेंद्र फडणवीसांसोबत सावली सारखे वावरताना दिसत आहेत.
दरम्यान विनोद तावडे यांना देखील विधानसभेला डावलण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ते शिक्षणमंत्री होते. फडणवीसांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र आता त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ‘अभाविप’चे नेते म्हणून काम केलेले तावडे यांना भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. अर्थात त्यांच्या पुनर्वसनाचाच हा प्रयत्न असल्याचं बोलल जात आहे.
भाजपने एकनाथ खडसे यांना देखील उमेदवारी नाकारली होती. मात्र ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसानाचा प्रश्न येत नाही. मात्र त्याचवेळी भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर येऊ शकतो. याआधी त्यांना विधान परिषद देणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी पंकजा यांचं नाव वगळण्यात आलं. आता त्यांचंही पुनर्वसन होणार का, हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
पदासाठी हात पसरवणार नाही : पंकजा मुंडे
भाजपमध्ये पुनर्वसनाचे वारे सुरू असताना पंकजा मुंडे यांनी आपली खदखद पुन्ह एकदा व्यक्त केली. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही’ असं पंकजा यांनी म्हटलं.