पुणे -राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवन सुरक्षा वीमा कवच लागू करावे. सर्व संवर्गातील पदोन्नती तात्काळ देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी येत्या मंगळवारी (दि.28) एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास दि.4 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निश्चय संघटनेने केला आहे.नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना मागील दोन – तीन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. संघटनेच्या एकून 11 मागण्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने करोना च्या काळात मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 15 टक्के उपस्थितीचे बंधन असताना 100 टके उपस्थितीमध्ये काम करत आहेत. विभागातील कर्मचाऱ्यांनी मागनी करून सुध्दा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये करोनामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.
शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये कोणत्याही सोयी -सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. शासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.